मुंबई, 30 जून: महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे विधान परिषद आमदार (MLC) आणि आदित्य ठाकरेंचे अत्यंत खंदे समर्थक मानले जाणारे सचिन अहिर यांनी आज 30 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील ८ दिवसांपूर्वी पक्षाच्या ९ पैकी ६ लोकसभा खासदारांनी केलेल्या बंडानंतर, उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एकाच आठवड्यात बसलेला दुसरा आणि अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे. पक्षांतराचा हा निर्णय घेताच सचिन अहिर यांनी शिवसेना (UBT) पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणारे पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
थेट उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल –
शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच काही तासांच्या आत सचिन अहिर यांना महायुतीकडून मोठी भेट मिळाली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सचिन अहिर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज भरताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. सचिन अहिर यांच्या या थेट उमेदवारीमुळे महायुतीने ठाकरे गटाला विधीमंडळातही खिंडार पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाकरे गटाला ‘वरळी’त मोठा सुरुंग –
सचिन अहिर यांचा हा निर्णय आदित्य ठाकरे यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईतील वरळी विधानसभा क्षेत्रात सचिन अहिर यांचा मोठा राजकीय दबदबा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळीतून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यात आणि तिथे शिवसेना मजबूत ठेवण्यात अहिर यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाला ‘वरळी’त मोठा सुरुंग लागल्याचे बोलले जात आहे.
एकाच आठवड्यात दुसरा राजकीय भूकंप –
गेल्या शनिवारी 22 जून रोजी ठाकरे गटातील ६ लोकसभा खासदारांनी (संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. या खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती, ज्याला ४ लोकप्रतिनिधींनी दांडी मारली होती. तेव्हापासूनच ठाकरे गटाचे आमदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर, आज सचिन अहिर यांच्या रूपाने पहिला आमदार (MLC) फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘ऑपरेशन टायगर’ सुरूच? –
शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून ठाकरे गटाचे आणखी 14 ते 16 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात असून राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांच्या या बंडानंतर ठाकरे गटातील इतर आमदारांच्या हालचालींकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सहा लोकसभा खासदारांपाठोपाठ आता विधान परिषदेचा अत्यंत महत्त्वाचा मोहरा गळाल्याने आणि विधीमंडळ अधिवेशनाच्या ऐन तोंडावर हा धक्का बसल्याने ठाकरे गटासमोरील अडचणी कमालीच्या वाढल्या आहेत.
कोण आहेत सचिन अहिर? –
सचिन अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार असून मुंबईच्या राजकारणातील एक मातब्बर चेहरा आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली असून, एकदा ते विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. मुंबईतील वरळी मतदारसंघातून त्यांनी सलग तीन वेळा (१९९९, २००४ आणि २००९) विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. २००९ च्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती.
दरम्यान, दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर, २६ जुलै २०१९ रोजी त्यांनी मातोश्रीवर जात अधिकृतपणे अखंड शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील प्रवेशानंतर २०२० मध्ये त्यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली, तर २०२२ मध्ये पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून पाठवले. ३० जून २०२६ रोजी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे.






