मुंबई, 4 जून : राज्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकींना अवघे काही महिने शिल्लक असताना राज्याचे राजकारण तापलंय. महायुती सरकारमधील मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून राज्याचे राजकारण तापले आहे.
संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल –
खासदार संजय राऊत यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना सांगितले की, गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक ठेकेदार, बिल्डर असून तो पैशांचे सर्व व्यवहार करतो. त्याचा फोन आल्याशिवाय गिरीश महाजन एकाही फाईलवर सही करत नाहीत. जिथे सामान्य माणसांच्या जीवनाशी तसेच भविष्याशी संबंध येतो, तिथे सुद्धा गिरीश महाजन यांचे दलाल हे मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात. अशा व्यक्तीने आमच्या पक्षफोडीच्या गोष्टी कराव्यात. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू-संतांचं महामंडळ तयार केलं आहे, त्यातले एक गिरीश महाजन आहे, अशीही टीका यावेळी राऊतांनी केली आहे.
View this post on Instagram
गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट मंत्री –
कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने काल गिरीश महाजन अनेक साधूसंतांच्या पाया पडत होते. पण त्यांनी त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ईडी पीडित साधूसंतांच्या पाया पडले पाहिजे. त्यांना या सर्वांमुळे शिवसेना फुटीचा आनंद घेता आला. अन्यथा त्यांची तपश्चर्या कधीच पूर्ण झाली नसती, असा टोला राऊतांनी लगावला. दरम्यान, गिरीश महाजन यांना या मंत्रिमंडळात घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.