जळगाव, 31 मे : धुळे जिल्ह्यात कोट्यवधींचं घबाड सापडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असताना अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये. दरम्यान, आज जळगावच्या दौऱ्यावर असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी धुळ्याच्या प्रकरणासह विविध मुद्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलीय.
संजय राऊत काय म्हणाले? –
जळगावात आज सकाळी माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना नजराणा देण्यासाठी ही रक्कम होती. अर्जुन खोतकर हे एशिंशि पक्षाते आहेत. ते आधी शिवसेनेत होते. मात्र, ज्यावेळी ते एका प्रकरणात ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाल्यामुळे ते त्या पक्षात पळून गेले. हा त्यांचा पुर्व इतिहास आहे. दरम्यान, दोन कोटींच्या आसपास रक्कम त्यांच्या पीएकडे सापडली. ठेकेदारांनी गोळा करून ती त्यांना आणली. हा 15 कोटींचा हिशेब होता. 10 कोटी रूपये त्यांच्या जालन्यातल्या घरी जमा करायची होती. याठिकाणी जर दुसरे कोणी असतं तर ईडी-सीबीआयने धडाधड त्याठिकाणी पोहचले असते.
दरम्यान, भ्रष्टाचाऱ्यांना तुरूंगात टाकू असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी काय केलं. कोणावर गुन्हे दाखल केले. एसआयटी स्थापन केली मात्र, ही एसआयटी कोणाच्या नेतृत्वात स्थापन आणि सदस्य कोण आहे, याची माहिती त्यांनी दिलीय का असे अनेक सवाल करत लोकांना फसवण्याचे धंदे बंद करा, अशी जोरदार टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीय.
राऊतांची पालकमंत्र्यांवर जोरदार टीका –
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसुतीची घटनेवरून संजय राऊतांनी टीका केली आहे. महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होताएत. जळगावमध्ये लोकांना उपचार मिळत नाहीत. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाहीत आणि मंत्री फक्त पद मिरवतात, पण जनतेचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात. लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होताएत त्यांना उपचाराने रूग्णवाहिका मिळत नाहीये, यावर तुमचं मत कधी व्यक्त झालंय का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे तोंड काळ करण्याचं काम तुम्ही करत असल्याची टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर नाव न घेता संजय राऊतांनी केलीय.
संजय राऊत यांचा जळगाव दौरा –
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या चाचपणीसाठी जळगावात आलो आहोत. पुढील कोणत्याही चार महिन्यात निवडणूका होतील. अशावेळी विधानसभा किंवा लोकसभेत काय झालं यात न पडता येणारी निवडणूक ही त्याच ताकदीने लढवायची असून यासाठी शिवसेनेच्या (ठाकरे गट) दौरे सुरू असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली.