विशेष लेख | चंद्रकांत दुसाने – विशेष प्रतिनिधी
28 जानेवारी 2026. सकाळचे सुमारे 8.45 वाजले होते. ठिकाण — बारामती विमानतळ अन् घटना घडली ती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची. अजित दादांसह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानं अवघ्या काही क्षणांत संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. कणखर नेतृत्व, स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावरची पकड आणि तात्काळ निर्णयक्षमता यासाठी ओळखले जाणारे अजित पवार अचानक काळाच्या पडद्याआड गेले. राज्य शोकसागरात बुडालं; कार्यकर्ते, समर्थक आणि सामान्य नागरिक हळहळले.
मात्र, राजकारण आणि प्रशासन भावना थांबवून चालत नाही, हे वास्तव पुन्हा एकदा समोर आलं. अजित पवार यांच्या निधनानंतर पुढे काय, हा प्रश्न पक्षासमोर उभा राहिला. त्यांच्या अस्थी संकलन व सारी सरळकण्याचे विधी सुरू असतानाच राजकीय हालचालींना वेग आला. एकीकडे पतीचे अकाली निधन आणि दुसरीकडे पक्ष व राज्याच्या स्थैर्याची जबाबदारी — अशा कठोर परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी अवघ्या चौथ्या दिवशी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
खरंतर, अजित दादांच्या निधनानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवरून महाराष्ट्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. शोककाळ अजून संपलेला नसताना, तिसऱ्या दिवसाच्या विधींच्या दरम्यानच सत्ता आणि पदांची चर्चा सुरू होणं अनेकांना अस्वस्थ करणारं ठरलं. “ही घाई गरजेची होती का?” “माणसाला खुर्चीपेक्षा जास्त महत्व आहे का?” असे प्रश्न उपस्थित झाले.
सत्ता ही केवळ पद किंवा प्रतिष्ठेसाठी नसते. ती लोकांच्या अपेक्षा, प्रशासनाची गती आणि राज्याच्या स्थैर्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी कुणाच्या दुःखाची वाट पाहत नाही. म्हणूनच, कधी कधी भावना गिळूनही पुढे जावं लागतं. हे वास्तव कठोर आहे, पण अपरिहार्यही आहे.
अजित दादांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रात घडणाऱ्या या साऱ्या घडामोडींमध्ये एक ऐतिहासिक क्षण मात्र नोंदला गेला आहे. गेल्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. हा क्षण आनंदाचा, गौरवाचा असायला हवा होता; पण नियतीने तो दुःखाच्या सावलीत दिला. तरीही, पतीच्या निधनानंतर दुःखांचा मोठा डोंगर समोर असताना, एका महिलेनं स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून राज्याची जबाबदारी स्वीकारली, हे दुर्लक्षित करता येणार नाही.
अजित पवार यांनी आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यात कामाला प्राधान्य दिलं. अगदी पहाटे पासून त्यांच्या दिनक्रम सुरू व्हायचा. सकाळपासून प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत फील्डवर जाऊन प्रकल्पांची पाहणी असो की शासकीय निवास्थानी आलेले जनतेचे प्रश्न सोडवणे असो, अशी त्यांची कार्यपद्धती होती. उत्तम निर्णयक्षमता आणि जगण्यातील शिस्तबद्धता ही त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख होती.
अजित दादांच्या व्यक्तिमत्वासारखी भूमिका आज त्यांच्या अनुपस्थितीतही पुढे नेण्याची वेळ आली आहे. सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या निर्णयामागे पक्षातील नेत्यांचा आग्रह किंवा सत्तासमीकरणांची कारणे असू शकतात. मात्र, आज सुनेत्रा पवार यांच्यावर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्यातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी आहे.
दुःखाच्या काळात स्वीकारलेली ही जबाबदारी पुढील काळात जनतेच्या विश्वासात कशी बदलते, हे महत्त्वाचं ठरेल. वैयक्तिक दुःखाच्या या अत्यंत कठीण काळात सुनेत्रा पवार यांना सहनशक्ती आणि धैर्य लाभो, हीच अपेक्षा. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वीकारलेली ही जबाबदारी राज्याच्या हितासाठी यशस्वी ठरो, अशा सदिच्छा.






