30 नोव्हेंबर, पुणे : महायुतीला मोठं यश मिळाले असतानाही नवे सरकार अस्तित्वात आलेले नाहीये. असे असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या दरे या गावी कालपासून मुक्कामी आहेत. यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राक्षसी बहुमतानंतरही राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जावे लागतंय, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाच्या समारोपप्रसंगी ते माध्यमांसोबत बोलत होते.
उद्धव ठाकरे काय म्हणाले? –
उद्धव ठाकरे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, आज राज्यात राक्षसी बहुमतानंतरही महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही, यांचे सगळ्यांचे चेहरे हे असे विश्मयकारक आहेत. राक्षसी बहुमतानंतरसुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करण्यासाठी शेतात का जावं लागतंय? खरंतर राजभवनावर जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो. गेली 25-30 वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो तरी पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली, तेव्हा तर सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लावली होती.
View this post on Instagram
“…म्हणून यांना जागावाटपात वेळ लागतोय” –
आज कोणीही दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे. तरी राष्ट्रपती राजवट का नाही, या सर्व प्रश्नांचे उत्तर कोणाकडेच नाहीये..असे असतानाही एवढे बहुमत मिळाल्यानंतरही राजभवनावर जाण्याऐवजी हे लोकं शेतात का जातात?, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावलाय. दरम्यान, राज्यात आपलं सरकार येईल, असे यांना वाटले नव्हते. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार तसेच मंत्रीमंडळात कोण येणार?, याची काहीच तयारी नव्हती. म्हणून जागावाटपात वेळ लागतोय, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर केली आहे.
बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाचा समारोप-
ईव्हीएममध्ये घोटाळ्याचा आरोप करत गेल्या तीन दिवसांपासून बाबा आढाव यांनी पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. विरोधकांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. दरम्यान, बाबा आढाव यांच्या या आंदोलनाचा आज सायंकाळी समारोप करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील, अॅड. असीम सरोदे, आदी उपस्थित होते.
हेही वाचा : सौंदाळा गावातील ग्रामसभेत शिव्या देण्यावर बंदीसह समाजहिताचे ठराव; नेमके निर्णय काय?