काठमांडू (नेपाळ), 24 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून नेपाळमधील पशुपतिनाथ येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांची बस 500 फूट उंचावरुन नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 27 भाविकांचा मृत्यू झालाय. दरम्यान, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे ह्या नेपाळमधील काठमांडू येथे पोहचल्या असून त्यांनी सदर घटनेबाबत बचाव कार्य आणि पुढील कारवाईबाबत माहिती घेतलीय.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल –
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ह्या काल रात्रीच जळगावरून रात्री उशिराने मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. यानंतर आज सकाळी त्या नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्या. दरम्यान, त्यांनी भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळ परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सहसचिव ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत बचाव कार्य आणि पुढील कारवाईबाबत माहिती घेतलीय. दरम्यान, नेपाळच्या बस अपघातातील जखमींना वाचविण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, रक्षा खडसे यांच्यासोबत भुसावळचे आमदार संजय सावकारे हे देखील उपस्थित आहेत.
नेपाळ बस अपघात दुर्घटना –
नेपाळमधील पशुपतीनाथ येथे दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस तनहू जिल्ह्यातील मार्सयागडी नदीत कोसळल्याने 27 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर काठमांडूसह तनहू रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये काहीजण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव तळवेल, गाळेगाव मधील आहेत. यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनच्यावतीने दिल्ली तसेच नेपाळ सरकारमधील अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्यात आला. याबाबतची माहिती त्याठिकाणाहून घेण्यात आली.
दरम्यान, नेपाळ बस अपघात दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संवाद साधला.
दरम्यान, आज शनिवारी या दुर्दैवी अपघात मृत पावलेल्यांचे मृतदेह नाशिक विमानतळावर आणण्यात येणार आहेत. यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात ते देण्यात येणार असल्याची माहिती आहे.