जळगाव, 7 फेब्रुवारी : शेतकऱ्यासाठी कापूस हे सोने असते. आपल्या मुलाला जसे जपले जाते, तसा शेतकरी आपल्या शेती पिकाला जपतो. सध्या कापसाचा हंगाम सुरू आहे. शेतकरी कापसाचे भाव वाढण्याची वाट पाहत आहेत. कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. याबाबत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.
कापसाच्या भावावरुन मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले –
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, 9 हजार 600 रुपये भाव असतानाही शेतकऱ्यांनी कापूस काढला नाही, त्यामुळे थोडा अडचणीचा विषय शेतकऱ्यांना झालेला आहे. त्यावेळी जर शेतकऱ्यांनी कापूस काढला असता तर 7 हजार 800 रुपयांवर आपण अडकून पडलो नसतो, असे भाष्य त्यांनी केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना असं वाटलं की, 10 हजारांच्या वर भाव मिळेल, शेवटी प्रत्येकाला आशा असते आणि शेतकऱ्याला ती आशा काही चुकीची नाही. पण मला तरी असे वाटते की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाचे भाव चढ-उतार होत असल्यामुळे साहजिक आहे की, 7 हजार 800 रुपये भाव मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – कापसाला 10 हजाराचा भाव द्या, पाचोऱ्यात विविध मागण्यांसाठी उद्या धरणे आंदोलन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना काही दिलासा देता येतो का, याची मांडणी मी 100 टक्के करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सध्या कापसाला 7 हजार 600 ते 7 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांना कापसाचे भाव वाढण्याची आशा आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी अजून कापूस विकलेला नाही. आगामी काळात कापसाचे भाव वाढतात का, याची शेतकरी वाट पाहत आहेत.