जळगाव, 18 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांबुर्णी शिवारात थांबलेल्या मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षीय बालिकेला मध्यरात्री उचलून नेत बिबट्याने ठार केले होते. बिबट्याने ठार केल्याची ही गेल्या दीड महिन्यातील दुसरी घटना होती. यामुळे तातडीने बिबट्याला जेरबंद केले जावे, अशी मागणी केली जात होती. दरम्यान, दोन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्यानंतर अखेर वनविभागाच्या तातडीच्या कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
नेमका कसा अडकला सापळ्यात? –
यावल तालुक्यातील डांबुर्णी येथील प्रभाकर चौधरी यांच्या मा.ग.क्र. 741 मधील शेतात 17 एप्रिल रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास रत्ना सतीश ठेलारी (वय 2 वर्षे) या दोन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने झडप घालून केळीच्या बागेत ओढत नेऊन ठार केले होते. अखेर, वनविभागाच्या तातडीच्या कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) समाधान पाटील यांच्या नेतृत्वात, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम सुनील भिलावे, यावल पूर्वचे स्वप्निल फटांगरे, तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. सदर भागात चार पिंजरे लावण्यात आले. रविंद्र फाळक (मानद वन्यजीव रक्षक, जळगाव), अमन गुजर यांच्या सहकार्याने डॉ. यश सागर (पशुवैद्यकीय अधिकारी, TTC जळगाव) व वनपाल गणेश गवळी (शूटर) यांना पिंजऱ्यात तैनात करण्यात आले.
दरम्यान, रात्री 9 वाजता बिबट्या पिंजऱ्याजवळ आल्यावर वनपाल गणेश गवळी यांनी अचूक निशाणा साधत बेशुद्धीचे इंजेक्शन टोचले. Thermal Drone च्या सहाय्याने शोध घेत त्याला काही अंतरावर गवतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्यावर सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले. बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे.
“नागरिकांनी अशा घटनांमध्ये वनविभागास सहकार्य करावे, त्यामुळे कारवाई यशस्वी होते,” असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी केले आहे.