अमळनेर, 1 ऑगस्ट: अमळनेर शहरातील भालेराव नगर येथील गुरुकृपा कॉलनी परिसरात मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने एका घराला वेढा घातल्याने अवघ्या एक महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब जीवाच्या आकांताने घरात अडकून पडले होते. सुमारे दोन तास चाललेल्या धाडसी बचाव मोहिमेनंतर नगरपालिकेच्या अग्निशमन व आरोग्य विभागाच्या पथकाने सर्वांना सुखरूप बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलविले. या धाडसी कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली शुभम सरदार (रा. छत्रपती संभाजीनगर) या प्रसूतीसाठी त्यांचे भाऊ भागवत जगन्नाथ बिराडे (रा. अमळनेर) यांच्या घरी आल्या होत्या. दरम्यान, मुसळधार पावसामुळे गुरुकृपा कॉलनीलगतच्या नाल्याला अचानक पूर आला. पुराचे पाणी घरात शिरल्याने वैशाली सरदार, त्यांचे एक महिन्याचे बाळ आणि कुटुंबातील इतर सदस्य घरात अडकून पडले. वाढत्या पाण्यामुळे त्यांनी घरातील उंच ठिकाणी आश्रय घेत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळताच अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नाल्याच्या पाण्याचा वेग आणि छातीपर्यंत आलेल्या पाण्यामुळे बचावकार्याला मोठे आव्हान निर्माण झाले.
यानंतर दोर आणि लाईफ जॅकेटच्या सहाय्याने बचाव साखळी तयार करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत तब्बल दोन तास अथक प्रयत्न करत पथकाने सर्वप्रथम एक महिन्याच्या बाळाला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर बाळाची आई, तीन महिला, तीन लहान मुले, एक तरुण तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचीही सुखरूप सुटका करून जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षित हलविण्यात आले.
या धाडसी बचाव मोहिमेत आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन कर्मचारी फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंद शिव आणि पवन बिऱ्हाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आपत्तीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीसाठी धावून आलेल्या अग्निशमन व आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, त्यांच्या या कार्यामुळे एका चिमुकल्या बाळासह संपूर्ण कुटुंबाला नवजीवन मिळाले आहे.






