जळगाव, 20 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीबाबत दिलेली साद आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यावरून ठाकरे बंधुंच्या युतीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा केल्या जात आहेत. यावरूनच आता जळगावचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी देखील ठाकरे बंधुंच्या युतीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया –
जळगावात माध्यमांसोबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्यांचा-त्यांचा विचाराचा प्रश्न आहे. राज ठाकरेंना काय वाटतं हा त्यांचा विषय आहे. आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा विषय आहे. शेवटी, कोण-कोणाबरोबर जावं हा त्यांचा पक्षाचा आणि त्यांचा विषय आहे. यामुळे मला त्याबाबत बोलणं उचित होणार नाही. त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात. गुलाबराव पाटील बोलतील अन् ते निर्णय बदलवतील असं होत नाही. शेवटी ते त्यांच्यापद्धतीने त्यांचा निर्णय घेतील.
राज ठाकरे वेगळा विचार करणारे व्यक्ती –
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, राज साहेबांना जो विषय त्यांना आवडतो तसा ते निर्णय घेतात. लोकसभेत ते आमच्यासोबत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार आमच्याविरोधात होते. उद्या जर त्यांना वाटलं की, हे चांगलं काम करू शकतात. तर ते त्यांच्याबरोबर येऊ शकतात. मागच्या काळात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचाही त्यांना प्रचार केला होता. त्यामुळे राज ठाकरे हे गुजरातला देखील गेले होते, मोदींचं काम बघायला. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही त्यांची दोस्ती आहे. यावरही ते बोलतात. देवेंद्रजी आणि त्यांचीही मैत्री आहे त्यावरही ते बोलतात. दरम्यान, राज ठाकरे हा वेगळा विचार करणारा व्यक्ती असून त्यांच्या मनात काय आहे आहे, हे आपण काय सांगू शकतो, असेही मंत्री पाटील म्हणाले.
….तर आज शिवसेना कुठे राहिली असती –
आमची आपआपसातील भांडणे हे आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी बाजूला ठेवायला तयार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, हाच विचार जर मनसे स्थापन होण्याची आधी झाला असता तर आज शिवसेना कुठे राहिली असती, याचा दोघांनी विचार करावा. दरम्यान, हे दोघंही नेते सक्षम असून त्यांच्या युतीबाबत आम्ही बोलू शकणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचारांची शिवसेना पुढे नेतोय आणि यापुढेही आमची शिवसेना कशी वाढेल, याचा प्रयत्न आमचा चालू राहील, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
….त्या ठाकरेंना देखील आम्ही सोडून देऊ
तसेच ठाकरे कुटुंबियांविषयी आमची कधीही कटुता नव्हती, पण बाळासाहेबांचा विचार जो सोडतो, तो ठाकरे नावाचा असेल किंवा अन् कोणी असेल त्याला आमचा विरोध असतो. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी तसेच हिंदुत्वाच्या रक्षणसाठी लढणारी शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार होता. त्या विचाराबरोबर आम्ही आहोत. जो ठाकरे त्या विचारांना सोडले त्या ठाकरेंना देखील आम्ही सोडून देऊ. दरम्यान, एक ठाकरे चंचल आहेत तर एक शांत आहेत..यामुळे बघा पुढे काय होतं, असेही मंत्री पाटील म्हणाले.
हेही वाचा : तापमानाचा चढला पारा अन् राज्यात उन्हाचा तीव्र तडाखा; जळगावचा पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज काय?