जळगाव, 12 मे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. एकीकडे खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असताना राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता –
राज्यातील विविध भागात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झालाय. दरम्यान, पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सापाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची ही माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात हा वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? –
मान्सून सध्या अंदामान निकोबार तसेच बंगालच्या उपसागरात दाखल झालाय. दरम्यान, यंदा मान्सूनचा पाऊस हा 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच 2008 नंतर पहिल्यांदाच मान्सून हा नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत. यानंतर 6 जूनपासून महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास सुरू होणार आहे. यासोबतच 30 जूनपर्यंत संपुर्ण भारत नवी दिल्लीपर्यंत पोहचणार आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यासोबतच मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास विजेंच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.