मुंबई, 26 जून : धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप कामगार मोर्चाचे रावेर पुर्वचे सरचिटणीस मिलिंद वाणी यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेतली. यावेळी सुरक्षा रक्षकांच्या वेतनात नवीन किमानवेतनवाढ 3000 रूपयांची करण्यात यावी, अशा मागणीचे निवदेन देण्यात आले. यावेळी माजी आमदार शरद पाटील, सुरक्षा रक्षक पंकज कोळी, वैभव कोळी, बाबासाहेब झाडे, गोविंद महाजन सजय महाजन, ईश्वर बडगुजर, किशोर बडगुजर, आदी उपस्थित होते.
निवदेनात काय म्हटलंय? –
निवदेनात म्हटल्याप्रमाणे, धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात कार्यरत असलेले सुरक्षा रक्षकांना जानेवारी 2020 मध्ये वेतनवाढ करण्यात आलेली होती. तरी डिसेंबर 2023 मध्ये सुमारे तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असुन मंडळाकडून नवीन वेतनवाढ वर्ष 2024 जानेवारी पासुन सुरक्षा रक्षकांना बंधनकारक होती.
परंतु, नवीन वेतन वाढीला संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केलेले आहे, असे दिसुन येत आहे. दरम्यान, वाढती महागाई लक्षात घेता आणि सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांचा विचार करून सुरक्षा रक्षकांना नवीन वेतनवाढ लागू करण्यात यावी, अशी मागणी निवदेनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.