जळगाव, 11 जून: जनतेच्या प्रश्नांचे निवारण करणे हेच प्रशासनाचे ध्येय असून जनसमाधान बैठकीत प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या विविध विषयांवरील समस्यांचे अर्ज संबंधित विभागांनी तात्काळ निकाली काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले.
पाचोऱ्यात जनसमाधान बैठक संपन्न –
नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी पाचोरा उपविभागीय कार्यालयात आयोजित ‘जनसमाधान बैठकी’त ते बोलत होते. यावेळी नागरिकांनी विविध विषयांवरील अर्ज सादर करून समस्या मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जाची माहिती जाणून घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अर्जदारांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी अर्जदारांना दिला.
बैठकीस उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शितल सोलाट यांच्यासह कृषी, आरोग्य, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, महिला व बाल विकास, जिल्हा परिषद आणि पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
View this post on Instagram
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, बैठकीत प्राप्त सर्व अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्यात येतील आणि त्यावर त्यांनी निर्णय घेऊन अर्जदारांना तात्काळ माहिती यावी. या बैठकीत त्यांनी सुमारे तीन तास उपस्थित राहून 100 हून अधिक अर्जदारांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.
जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या, दैनंदिन प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी आणि तक्रारींचे स्थानिक स्तरावर गतीने, समन्वयाने व कालबद्ध निवारण व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून उपविभाग स्तरावर ‘जनसमाधान बैठक’ हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी दर गुरुवारी संबंधित उपविभागीय कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. त्यामुळे नागरिकांना शासनस्तरावर प्रलंबित विषयांसाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज कमी होणार असून स्थानिक स्तरावरच निराकरणाची प्रक्रिया वेगवान होणार आहे.
पारदर्शकता व कार्यक्षमतेसाठी बैठकीत प्राप्त प्रत्येक अर्जाचे तात्काळ स्कॅनिंग करून ‘जनसमाधान पोर्टल’वर नोंद करण्यात येते. प्रत्येक अर्जास क्यूआर कोड देण्यात येत असून त्याद्वारे अर्जावरील कार्यवाहीचा मागोवा घेणे आणि अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहणे नागरिकांना शक्य होणार आहे.
हेही वाचा: PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान






