मुंबई, 4 सप्टेंबर : संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही मान्यता देण्यात आली.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दीड हजार रूपये अर्थसहाय्य दिले जात होते. आता ते अडीच हजार रुपये दिले जाणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
दरमहा अडीच हजार रुपये मिळणार अर्थसहाय्य –
राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते. सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत 4 लाख 50 हजार 700 आणि श्रावणबाळ योजनेत 24 हजार 3 दिव्यांग लाभार्थी आहेत.
या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली. हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल. यासाठी आवश्यक 570 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.






