नवी दिल्ली, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून सन 2026 साठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येणार असून यंदा महाराष्ट्रातील चार व्यक्तींनाही हा सन्मान मिळाला आहे.
लोककला व लोकनाट्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल प्रसिद्ध तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्रीरंग देवबा लाड यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यातील वारली लोकसंगीत कलाकार भिकल्या लाडक्या ढिंडा तसेच सामाजिक कार्यातील योगदानासाठी आर्मिदा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्र सरकारने यंदा एकूण 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी निवड केली असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सन्मानितांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांचा समावेश असून लोकनाट्य, लोककला, कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात येत आहे.
लोकनाट्य आणि तमाशा कला जपण्यासाठी रघुवीर खेडकर यांनी आयुष्यभर दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी त्यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले होते. तसेच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने विठाबाई (कांताबाई) आणि रघुवीर खेडकर यांना तमाशा सादर करण्याचा मानही मिळाला होता.
महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कारार्थी –
- रघुवीर खेडकर
- भिकल्या लाडक्या ढिंडा
- श्रीरंग देवबा लाड
- आर्मिदा फर्नांडीस
इतर पद्म पुरस्कारार्थी मान्यवर –
भगवंदास रायकर (मध्य प्रदेश), ब्रिज लाल भट्ट (जम्मू-काश्मीर), चरण हेम्ब्रम (ओडिशा), चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश), डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-काश्मीर), कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल), महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा), नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा), ओथूवर तिरुथानी (तमिळनाडू), रघुपत सिंह (उत्तर प्रदेश), राजस्तापती कालीअप्पा गौंडर (तमिळनाडू), सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड), थिरुवरूर बख्तवसलम (तमिळनाडू), अंके गौडा (कर्नाटक), डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश), गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान), खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा), मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात), मोहन नगर (मध्य प्रदेश), नीलेश मंडलेवाला (गुजरात), आर. अँड एस. गोडबोले (छत्तीसगड), राम रेड्डी ममिडी (तेलंगणा), सिमांचल पात्रो (ओडिशा), सुरेश हनागवाडी (कर्नाटक), तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश), युनम जत्रा सिंह (मणिपूर), बुधरी ताथी (छत्तीसगड), डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगणा), डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिळनाडू), हैली वॉर (मेघालय), इंदरजीत सिंह सिद्धू (चंदीगड), के. पाजनिवेल (पुडुचेरी), कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश), नुरुद्दीन अहमद (आसाम), पोकीला लेकटेपी (आसाम), आर. कृष्णन (तमिळनाडू), एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक), टागा राम भील (राजस्थान), विश्व बंधु (बिहार), धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात) आणि शफी शौक (जम्मू-काश्मीर).
या सर्व मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांच्या यशामुळे राज्याचा गौरव अधिक उंचावला आहे.
हेही वाचा : किस्से लोकभवनाचे – लेख क्र.- 15 | किस्सा राज्यपालांच्या ‘कुर्सी’चा






