मुंबई, 6 फेब्रुवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे रवाना झालेले विमान धावपट्टीवर उतरण्याच्या काही क्षण आधी कोसळले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुःखद घटनेविषयी आपल्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, राज्यावर आलेल्या या दुःखाच्या काळात कोणताही उत्सव साजरा करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय? –
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी मी वाढदिवस साजरा करणार नाही. या दिवशी कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, अशी माझी नम्र विनंती आहे.
अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात मी आणि संपूर्ण शिवसेना सहभागी आहे.
हेही वाचा : Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?






