जळगाव, 7 फेब्रुवारी : पद्मालय वनक्षेत्रात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तृतीयपंथीयाच्या मृतदेहामागील रहस्याचा जळगाव पोलिसांनी अवघ्या 48 तासांत उलगडा केला असून, प्रेमसंबंधातूनच हा खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तृतीयपंथीयासोबत प्रेमसंबंध असलेल्या युवकानेच वादातून ही हत्या करून मृतदेह जाळल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली माहिती? –
जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात माध्यमांसोबत बोलताना एसपी डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या युवकांना पद्मालय वनक्षेत्राच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला होता. याबाबतची माहिती 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता एरंडोल पोलिस स्टेशनला प्राप्त झाली होती. या प्राप्त माहितीनुसार, एरंडोल पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेहाची पाहणी केली. यावेळी हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर तांत्रिक पुरावे गोळा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.
दरम्यान, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर हा खून चार दिवस आधीच केल्याची माहिती समोर आली. यावरून सखोल तपासासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आलं होतं. यानंतर हरविल्याची तक्रार तसेच परिसरात जवळपास असलेल्या बिअर बारच्या सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जात होती.
या तपासणीदरम्यान, एका बिअरबारमध्ये एक महिला आणि पुरूष मद्य प्राशन करत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी युपीआयद्वारे पेमेंट केल्याचे तपासातून उघड झाले. दरम्यान, त्या महिलेसोबत दिसणाऱ्या युवकाला चौकशीसाठी बोलावून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या महिलेबाबत विचारण्यात आले.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात हा खून संशयितांनेच केल्याचे उघडकीस आले. स्वप्निल अशोक पाटील (वय – 21 रा. पहूर ता. जामनेर) असे आरोपीचे तर आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार खैरागड जि. राजनाथगांव राज्य-छत्तीसगड) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, मयत हा तृतीयपंथी असल्याचे तपासातून उघड झाले.
तृतीयपंथीसोबत प्रेमसंबंध अन् शेवट हत्येत –
सदर प्रकरणातील आरोपी स्वप्निल पाटील आणि तृतीयपंथी आकांक्षा यांच्यात प्रेमसंबंध होते. स्वप्निल पाटील हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस भरतीच्या तयारीसाठी नाशिकला गेला होता. याठिकाणी पोलीस भरतीची तयारी करत असतानाच मे 2025 मध्ये स्वप्निल आणि आकांक्षा यांच्यात ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.
दरम्यान, काही दिवसानंतर आकांक्षासोबत नातं ठेवण्याचा स्वप्निलचा नकार होता. म्हणून त्याने काही दिवस आकांक्षासोबत बोलणे बंद केले होते. यानंतर आकांक्षाने स्वप्निलची बदनामी करत त्याला वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली होती. तसेच तिने स्वप्निलकडे लग्नासाठी तगादा लावल्याने त्यांच्यात वाद होऊ लागले.
या वादादरम्यान त्या दोघांनी पद्मालय येथे भेटण्याचे ठरवले. आकांक्षा ही स्वप्निलला भेटण्यासाठी सुरतवहून जळगावला आली. यानंतर त्या दोघांनी पद्मालय येथील गणपती मंदिरात दर्शन घेतले. यानंतर दोघांनी सोबतच मद्यप्राशन केले आणि आकांक्षाने दिलेला हा त्रास सहन न झाल्याने संधी शोधत तिची हत्या केल्याची कबुली सदर प्रकरणातील आरोपी स्वप्निलने पोलिसांना दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली.
View this post on Instagram
अवघ्या 48 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला –
पद्मालयच्या जंगल परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. दरम्यान, सदर घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे अधिकारी व अंमलदार यांचे 4 पथके तयार करुन यांनी अत्यंत कौशल्याने तपास करून केवळ 48 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक –
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, पोलीस अंमलदार ईश्वर पाटील, पहूर पो.स्टे. कडिल पोलीस अंमलदार विनोद सुभाष पाटील तसेच स्थानिक गुन्हा शाखा, जळगाव कडिल सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार जळगाव पोलीस दलाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.






