मुंबई, 13 फेब्रुवारी : मुंबईतील मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. निलंबित मेडिकल परवाना पूर्ववत करून देण्यासाठी त्याने 50 हजार रुपयांची मागणी केली होती; मात्र तडजोडीनंतर 35 हजार रुपये स्वीकारताना दुसऱ्या मजल्यावर सापळा रचून त्याला पकडण्यात आले. मंत्रालयातच ही कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. निलंबित मेडिकल परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी एका क्लर्कने 50 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार होती. तडजोडीनंतर 35 हजार रुपये स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली.
लाचप्रकरणी क्लर्कला घेतले ताब्यात –
लाच प्रकरण संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी कारवाईदरम्यान कार्यालय ताब्यात घेत तपास केला आणि संबंधित क्लर्कला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणानंतर मंत्रालयात विविध चर्चांना उधाण आले आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल –
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून सरकारवर टीका करत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचा आरोप केला आहे. सामान्य नागरिकांची कामे पैशाशिवाय होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असून ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी तसेच संबंधित मंत्र्यावर कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.






