नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : मुंबईतील मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. निलंबित मेडिकल परवाना पूर्ववत करून देण्यासाठी त्याने 50 हजार रुपयांची मागणी केली होती; मात्र तडजोडीनंतर 35 हजार रुपये स्वीकारताना दुसऱ्या मजल्यावर सापळा रचून त्याला पकडण्यात आले. मंत्रालयातच ही कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली असताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री नरहरी झिरवळ यांची पहिली प्रतिक्रिया –
नवी दिल्लीत माध्यमांसोबत बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की, मी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि अयोग्य होती; असा प्रकार घडायला नको होता. राजेंद्र ढेरंग हे लिपिक पदावर कार्यरत असून सुनावणीसाठी लागणारी कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ते मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून उसनवारीवर त्यांची या विभागात नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित प्रकार त्यांच्या मार्फत घडला असून अशा कृत्याला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा दिला जाणार नाही.
View this post on Instagram
‘…अशा प्रकारे पैसे स्वीकारणे पूर्णपणे अयोग्य’ –
सदर कर्मचाऱ्याच्या पूर्वइतिहासाबाबत माहिती होती का, असा प्रश्न विचारण्यात आला असता झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, यापूर्वी त्यांच्या संदर्भात कोणतीही तक्रार त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती. लाचेची रक्कम कितीही असो, सरकारी कर्मचाऱ्याने अशा प्रकारे पैसे स्वीकारणे पूर्णपणे अयोग्य आहे. जर पैसे घेतल्याचे सिद्ध झाले, तर संबंधित व्यक्तीला कायद्यानुसार शिक्षा भोगावी लागेल.
“…..तर मी राजीनामा देईन!” –
विरोधकांकडून या प्रकरणातील धागेदोरे आपल्यापर्यंत पोहोचत असल्याचा आरोप केला जात आहे, याबाबत विचारले असता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. जर या प्रकरणाचे कोणतेही पुरावे माझ्याशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच या भ्रष्टाचाराशी माझा संबंध असल्याचे ठोसपणे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्रालय क्लर्क लाचप्रकरण –
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. निलंबित मेडिकल परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी एका क्लर्कने 50 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार होती. तडजोडीनंतर 35 हजार रुपये स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा : पीएम सूर्यघर योजना: सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे






