चाळीसगाव, 10 मार्च: बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा उकळण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी, चार पोलीस कर्मचारी आणि इतर संशयितांसह एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये ओझरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार कळंबेकर, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन निकम, रवींद्र बत्तीसे तसेच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेंद्र पाटील आणि सुनील निकम, मृत व्यक्तीची पत्नी अरुणा जाधव आणि भाऊ मिथून जाधव आणि विमा प्रतिनिधी प्रेम पाटील तसेच प्रविण पाटील यांचा समावेश असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
View this post on Instagram
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील राजेंद्र जालंदर जाधव यांचा १९ एप्रिल २०२५ रोजी दहिवद फाट्यावर अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. कारने धडक दिल्याने त्यांचा चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले होते.
दरम्यान, मृताचे वारसदार म्हणून पत्नी अरुणा जाधव यांनी ३ मे २०२५ रोजी खासगी इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाखांच्या विम्याचा दावा दाखल केला. विमा कंपनीने चौकशी केल्यानंतर तपासात राजेंद्र जाधव यांचा मृत्यू प्रत्यक्षात २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या आजाराने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या घरातील फोटोवरही हीच मृत्यूची तारीख होती.
या प्रकरणात मृत्यू दाखला आणि अपघात पंचनामा बनावट तयार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विमा कंपनीकडून करण्यात आलेल्या चौकशीत संशय निर्माण झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी सखोल तपास करून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.






