पुणे, 15 मार्च: शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून ते सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. आजच्या काळात शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी उच्च शिक्षण आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) यांची सांगड घालणे काळाची गरज आहे, राष्ट्रीय परिषदेत असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
कर्वे समाज सेवा संस्था, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल एज्युकेटर्स (MASWE) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन आज अत्यंत कल्पक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले. पारंपारिक दीपप्रज्वलना ऐवजी मान्यवरांनी ‘रोपट्याला पाणी’ घालून या ज्ञानाच्या सोहळ्याचा शुभारंभ केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे चेअरमन विनायक कराळे होते, तर व्हाइस चेअरमन शिल्पा पाठक यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. स्वागतपर भाषणात प्रा. महेश ठाकूर यांनी महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्मृतींना उजाळा देत, संस्थेच्या १९६३ पासूनच्या सामाजिक योगदानाचा आढावा घेतला. ही परिषद केवळ ९ दिवसांच्या नियोजनातून यशस्वीरित्या साकारण्यात आली, हे विशेष.
सीएसआर आणि रोजगार संधी:
भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेचे (IICA, नवी दिल्ली) अधिकारी श्री. मुकेश कुमार यांनी ‘शाश्वत शिक्षण आणि सामाजिक प्रभावामध्ये सीएसआरची भूमिका’ यावर बीजभाषण दिले. ते म्हणाले की, “सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी केवळ सरकारची नसून ती कॉर्पोरेट कंपन्या आणि प्रत्येक नागरिकाची आहे. सध्या देशातील एकूण सीएसआर निधीपैकी 33 ते 40 टक्के वाटा शिक्षण क्षेत्राला मिळत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात समाजकार्य (MSW) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीएसआर आणि सामाजिक सेवा क्षेत्रात करिअरच्या अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.”
‘मास्वे’चे (MASWE) अध्यक्ष प्रा. अंबादास मोहिते यांनी उच्च शिक्षणासाठी जीडीपीमधील तरतूद वाढवण्याची गरज व्यक्त केली. जागतिक स्तरावर बदल घडवण्यासाठी संशोधनाला प्राधान्य देणे आणि गांधीवादी विचारांच्या आधारे शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी नीलम पांडे पाठक यांनी ‘रोजगार ढाबा’ या उपक्रमाद्वारे गेल्या तीन वर्षांत ९,००० ते ४५,००० रोजगार संधी कशा निर्माण केल्या, याचा प्रेरणादायी प्रवास मांडला.
दुपारच्या सत्रात उच्च शिक्षण अभ्यासक्रमात शाश्वत विकासाचा अंतर्भाव करण्यावर तज्ज्ञांनी परिसंवादात (Panel Discussion) चर्चा केली. दिवसाची सांगता कर्वे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘कलागुण एकपात्री प्रयोग – कीर्तनाने’ झाली. संतांच्या शिकवणीतून सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची जोपासना कशी करता येईल, हे विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, डॉ. चित्रलेखा राजुस्कर, डॉ. देवानंद शिंदे, राहुल बिडवे, झैद अख्तर, आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, शर्मिला रामटेक यांनी केले तर, आभार प्रदर्शन प्रा. चयन परधी यांनी केले. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे 15 मार्च रोजी सकाळ आणि दुपारच्या सत्रात 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विविध संशोधकांचे शोधनिबंध सादरीकरण आणि केस स्टडीज सादर केल्या जाणार आहेत.






