जळगाव, 28 मार्च: नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना मोठ्या राजकीय वादाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली.
अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली असून, त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षातील महत्वाच्या पदावरूनही दूर व्हावे लागले आहे. या घडामोडीनंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
रोहणी खडसे यांची चाकणकरांवर खोचक टीका –
शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्यावर टीका करत, “वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ अखेर दोन ओळींच्या राजीनाम्यावर आला,” अशी बोचरी प्रतिक्रिया दिली. तसेच, अजित पवार गटातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही फेसबुक पोस्टद्वारे चाकणकर यांच्यावर निशाणा साधत, हा राजीनामा स्वेच्छेने नसून घेतला गेला असल्याचा आरोप केला. त्यांनी या प्रकरणात सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त करत संबंधित सर्वांवर कारवाईची मागणी केली.
रुपाली चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळले –
रुपाली चाकणकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशोक खरात याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी किंवा गैरकृत्यांशी आपला दूरान्वयानेही संबंध नसल्याचा त्यांनी पुन्हा एकदा दावा केला. माध्यमांमधून होत असलेले आरोप निराधार व वेदनादायक असल्याचे सांगत, सत्य अखेर समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चाकणकरांकडून महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा –
तपास प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष व्हावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच आपण पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा, असं त्यांनी या राजनाम्यात म्हटलंय.






