जळगाव, 19 मे: जळगाव जिल्ह्यात आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेल टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरत असल्याने प्रशासनाने नागरिकांना दिलासा देत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
…तर होणार कडक कारवाई –
प्रशासनाने पेट्रोल पंपधारकांना तांत्रिक कारणाशिवाय किंवा साठा संपल्याशिवाय ‘नो स्टॉक’चे फलक न लावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ग्राहकांना बाटल्या किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्री करू नये आणि साठेबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. साठा असूनही विक्री नाकारल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये –
पेट्रोल पंपांवर वाढणारी गर्दी लक्षात घेता वाहनांच्या रांगांचे योग्य नियोजन करून मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवून सुरक्षेची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही मेसेजची खातरजमा केल्याशिवाय तो पुढे पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तर परवाना रद्द करण्याची कारवाई –
अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्व पेट्रोल पंपांच्या साठ्याची तपासणी सुरू असून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंपधारकांविरोधात परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.
हेही वाचा: पाचोरा बाजार समितीत वजन तफावतीचा मुद्दा; प्रशासनाकडून तातडीने तपासणीचे निर्देश






