जामनेर, 25 मे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्य हे वादात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ” पेट्रोल पंपांवर लागलेल्या रांगेतील तब्बल ८० टक्के लोक हे काळाबाजार करण्यासाठी उभे आहेत,” असा थेट आरोप महाजन यांनी केला आहे. दरम्यान, मंत्री महाजन यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यभरातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
जामनेर येथे पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. केवळ पसरलेल्या अफवांमुळे नागरिक आणि शेतकरी भीतीने अतिरिक्त साठा करत आहेत. लोक दोन-दोन, पाच-पाच हजार लीटरचे ड्रम भरून ठेवत आहेत, ज्यामुळे बाजारात प्लास्टिकचे कॅन मिळणेही कठीण झाले आहे.
मागच्या वर्षी या कालवधीत झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या विक्रीच्या तुलनेत यंदा 25 टक्क्याने मागणीत वाढ झालेली आहे. निश्चितच युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या साठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र, सध्यास्थितीत मुंबलक पेट्रोल-डिझेल सगळ्यांकडे आहे. दरम्यान, खरेखुरे शेतकरी सोडले, तर इंधनासाठी रांगेत उभे असणारे जवळपास 80 टक्के लोक हे इंधनाचा काळाबाजार करण्यासाठीच तिथे गर्दी करत असल्याचे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय.
‘मंत्र्यांनी स्वतः पंपावर येऊन वास्तव पाहावे’; शेतकरी संतप्त
गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर शेतकरी संघटना आणि ग्रामीण भागातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी थेट आव्हान देत म्हटले आहे की, “मंत्री महाजनांनी वातानुकूलित गाड्यांमधून फिरण्याऐवजी स्वतः पेट्रोल पंपावर येऊन दिवसभर उभे राहावे, म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची फरफट आणि वास्तव समजेल.”






