जळगाव, 24 जून: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होत असून राज्यातील विविध भागात पावसाचे आगमन झाले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर वादळी वाऱ्यासह मुसळधार हजेरी लावली असून शेतकरी तसेच कडक उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस –
काल रात्रीपासूनच जळगाव शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत हवामानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाचोरा,भडगाव तसेच अमळनेर तालुक्यासह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज –
भारतीय हवामान विभागाने (IMD) जळगाव जिल्ह्यासाठी पुढील २४ ते ४८ तास महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
रखडलेल्या पेरण्यांना मिळणार गती –
जळगाव जिल्ह्यात यंदा मान्सून लांबल्याने खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या चित्र निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात सरासरी १२३.७ मिमी पाऊस अपेक्षित असताना अवघा १०.२ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावण्याच्या भीतीपोटी बळीराजा चिंतेत होता. आता झालेल्या या जोरदार पावसामुळे शेती कामांना वेग येणार असून कोरडवाहू शेतकरी पेरणीच्या तयारीत व्यस्त झाला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट –
महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होत असून, पुढील २४ तासांत राज्यातील विविध भागांत पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.






