मुंबई/जळगाव, 2 जुलै: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे जळगाव शहराशी संबंधित विविध प्रलंबित व जनहिताचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले. यामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील २,३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न, फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि महानगरपालिकेतील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी यांचा समावेश होता.
आमदार भोळे यांनी सभागृहात सांगितले की, जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील २,३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न सन २०१२ पासून रेडीरेकनर दर निश्चितीमुळे प्रलंबित आहे. हा प्रश्न हजारो व्यापाऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेने आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, नगरविकास विभागानेही त्यानुसार कार्यवाही करण्यास सांगितले असतानाही मनपाकडून अद्याप प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला नसल्याने हा प्रश्न रखडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. व्यापाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मनपाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
View this post on Instagram
याशिवाय शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक आणि लघु व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. पात्र फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करावी तसेच स्वतंत्र व्हेंडिंग झोन विकसित करावेत, अशी मागणी त्यांनी केली. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याने त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेतील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदांमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे नमूद करत, सर्व रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली.
जळगाव शहरातील व्यापारी, फेरीवाले, हातगाडीधारक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी यावेळी दिली.






