पाचोरा, 11 जुलै: पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील एका शेतकऱ्याने तुरी पिकावरील तणनाशकाची फवारणी करूनही तणांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा आरोप करत संबंधित कृषी केंद्र व औषध उत्पादक कंपनीविरुद्ध पाचोरा तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड यांच्याकडे 9 जुलै रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे. अमोल दामोदर शिंपी (रा. नांद्रा, ता. पाचोरा) असे तक्रारदार शेतकऱ्याचे नाव आहे.
नेमकी बातमी काय? –
अर्जात नमूद केल्यानुसार, अमोल शिंपी यांनी २८ जून २०२६ रोजी पाचोरा येथील गांधी चौकातील परेश कृषी केंद्र येथून तुरी पिकासाठी हेरन्ब या कंपनीचे शेरा या नावाचे तणनाशक खरेदी केले. या औषधासाठी त्यांनी सुमारे १,८०० रुपये खर्च केला.
दरम्यान, २९ जून रोजी मौजे नांद्रा शिवारातील गट क्रमांक १२६/४ मधील सुमारे पाच एकर क्षेत्रातील तुरी पिकावर संबंधित तणनाशकाची फवारणी करण्यात आली. कृषी केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार आठ दिवसांनंतर शेताची पाहणी केली असता, लहान-मोठ्या कोणत्याही तणांवर औषधाचा परिणाम दिसून आला नाही. तण जसेच्या तसेच असल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.
View this post on Instagram
यानंतर ६ जुलै रोजी त्यांनी परेश कृषी केंद्रात जाऊन याबाबत विचारणा केली असता, “आम्ही केवळ डीलर आहोत, दोष कंपनीचा आहे,” असे उत्तर देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्याने अर्जात केला आहे. या प्रकारामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत परेश कृषी केंद्र आणि संबंधित कंपनीची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी अमोल शिंपी यांनी पाचोरा तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड यांच्याकडे केली आहे.
कृषी विभागाकडून तक्रारीची दखल –
शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल कृषी विभागाने घेतली असून, तालुकास्तरीय पीक तक्रार निवारण समितीमार्फत प्रत्यक्ष शेत पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक तसेच तेलबिया संशोधन केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञांना पत्र पाठवून नांद्रा येथील संबंधित शेताची संयुक्त पाहणी व पंचनाम्यासाठी समितीची भेट आयोजित करण्याबाबत तारीख कळविण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने हालचाली सुरू केल्याने आता प्रत्यक्ष पाहणीनंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.






