नंदुरबार, 8 सप्टेंबर : जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन केली जात आहे. दरम्यान, माजी मंत्री बच्चू कडू यांनी मराठा समाजाने आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले आहे. ते नंदुरबारमध्ये बोलत होते.
काय म्हणाले बच्चू कडू? –
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. यादरम्यान सरकारकडून आरक्षणाची घोषणा करण्यात आली तरी देखील उपोषण मागे घेण्यात आलेले नाही आहे, त्यामुळे हे आंदोलन आता मागे घेतले गेले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने विचार केला आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
आंदोलन मागे घेतले पाहिजे –
बच्चू कडू पुढे म्हणाले की, कुणबी हा मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे. आम्ही देखील मराठा आहोत. आणि मराठा हा नाव एका जातीच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र प्रांताचा आहे. महाराष्ट्रात जे जे राहता ते सर्व मराठी आहेत. चुकून त्यांनी मराठी लिहिले त्यामुळे त्यांना आरक्षण मिळाले नाही आहे, यामुळे आता हे आंदोलन मागे घेतले गेले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार –
राज्यात अनेक बोगस दिव्यांग आहेत ते शिक्षक आणि इतर सरकारी नोकरीत दिव्यांगाच्या लाभ घेत आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर 3 डिसेंबरपर्यंत कारवाई करणार असल्याचे संकेत दिव्यांग कल्याण महामंडळाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिले आहेत. जिल्ह्यात 33 टक्के नुकसान झाल्यानंतर दुष्काळ जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून शासनाकडे पाठवले तर लगेच दुष्काळाची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळणार असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले.
दिव्यांगांच्या दारी अभियान –
राज्यात दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाल्या नंतर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. आतापर्यंत तेरा जिल्ह्यात दिव्यांगांच्या दारी अभियान हा कार्यक्रम राबवण्यात आला असून या कार्यक्रमामुळे आतापर्यंत ६६ हजार अपंग लोकांचे तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. यादरम्यान नंदुरबार जिल्ह्यात दिव्यांगांच्या दारी अभियान या कार्यक्रमासाठी बच्चू कडू नंदुरबार जिल्ह्यात आले होते.