जालना, 29 ऑगस्ट: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या ५८ लाख नोंदींच्या आधारे तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, महाराष्ट्रातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, तसेच आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबीयांना नोकरी व आर्थिक मदत द्यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे लढा देत असून आता माघार घेण्याची वेळ नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ‘आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. हा अखेरचा लढा आहे,’ असे म्हणत त्यांनी मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
सरकारने सर्व प्रश्न वेळेत सोडवावेत –
सरकारने मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, असे आवाहन करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना परिस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले. ‘आज सरकारशी गोडीने बोलत आहोत; मात्र उद्या परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे सरकारने सर्व प्रश्न वेळेत सोडवावेत,’ असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच अजित पवार यांचाही उल्लेख केला. मात्र, नंतर आपल्या वक्तव्याचा खुलासा करताना अजित पवार यांचा उल्लेख अनावधानाने तोंडून झाल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांचे निधन झालेले असल्याचे लक्षात आल्यानंतरही त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने, ‘अजितदादा गेल्यासारखे वाटतच नाहीत, त्यामुळे तोंडातून त्यांचे नाव आले,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
आता घरात बसून चालणार नाही. मुंबई असो किंवा अंतरवली सराटी, मराठा समाजाने वेळ मिळेल तसे आंदोलनात सहभागी व्हावे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. आपल्या लढ्यामुळे पुढील पिढ्यांचे कल्याण होणार असल्याचे सांगत त्यांनी समाजाला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.
दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून व्याज परतावा देण्याची मागणीही त्यांनी केली. सर्व प्रलंबित लाभ एकाचवेळी देण्यात यावेत, अशी मागणी करत ‘आता वाट पाहायची नाही,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती






