चाळीसगाव, 29 ऑगस्ट: हिंदू धर्म, संस्कृती आणि धार्मिक ग्रंथांविषयी शास्त्रशुद्ध माहिती देण्याच्या उद्देशाने चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम (मेहुणबारे) येथे साकारण्यात येणाऱ्या ‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’च्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उद्या, रविवार (30 ऑगस्ट) रोजी होणार आहे. धुळे-छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सध्या चार एकर जागा उपलब्ध झाली आहे.
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिर सेवा फाउंडेशन’च्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भाविकांना दर्शनापूर्वी धर्म, संस्कृती, शास्त्र आणि देव-देवतांविषयी माहिती देण्यात येणार आहे. यासाठी मंदिरापूर्वी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेसाठी तीन स्वतंत्र दर्शन सभागृह उभारण्यात येणार असून, प्रत्येक सभागृहाची क्षमता सुमारे एक हजार भाविकांची असेल. मोठ्या स्क्रीनद्वारे 15 ते 20 मिनिटे माहिती दिल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्याची संकल्पना आहे.
प्रकल्पात हिंदू धर्मातील वेद, शास्त्रे, पुराणे, उपनिषदे, महाकाव्ये आणि विविध ग्रंथांचे भव्य ग्रंथालय तसेच मोफत वाचनालय उभारण्यात येणार आहे. अभ्यासकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचेही नियोजन आहे. याशिवाय हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी एक दिवसापासून सहा महिन्यांपर्यंत विविध अभ्यासक्रम असलेले गुरुकुल सुरू करण्यात येणार आहे.
जगातील विविध देशांमध्ये आढळलेल्या प्राचीन हिंदू मंदिरांशी संबंधित मूर्ती, प्रतिमा आणि इतर पुराव्यांचे संग्रहालय हे या प्रकल्पाचे आणखी एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी गीर गायींची गोशाळाही उभारण्यात येणार असल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले.
उद्या सकाळी 7 ते 9 या वेळेत खडकी सीम फाटा, चाळीसगाव-धुळे महामार्ग येथे पुणे येथील उद्योजक कैलाशजी नंदा यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मेहुणबारे येथील वैष्णवी लॉन्स येथे सभा होणार आहे. हिंदुराष्ट्रसेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई आणि अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास जास्तीतजास्त धर्मबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सुनील सोनवणे ‘शिवेंदू’, संस्थापक-संचालक सुनील चव्हाण, संचालक कैलाशजी नंदा, समाधान पाटील आणि कीर्तनकार सतीश पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा: ‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात






