जळगाव, 4 सप्टेंबर: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी जळगाव प्रकल्पांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील वसंतवाडी येथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन Early Childhood Development (ECD) कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. बालकांचा सर्वांगीण विकास साधताना कुटुंब आणि समुदायाचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर त्यांनी यावेळी भर दिला. महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे यावेळी उपस्थित होते.
भेटीदरम्यान नायर यांनी अंगणवाडीतील बालकांचे वजन व उंची स्वतः मोजून त्यांच्या पोषणस्थितीचे Normal, SAM, MAM, SUW आणि MUW या निकषांनुसार वर्गीकरण करून घेतले. बालकांच्या वाढीचे नियमित मोजमाप, योग्य वर्गीकरण आणि त्यानुसार वेळेत आवश्यक हस्तक्षेप करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
वसंतवाडीतील बालकांमध्ये Stunting चे प्रमाण कमी असल्याचे पाहणीत आढळून आले. ही सकारात्मक स्थिती कायम ठेवतानाच Stunting चे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक तसेच आवश्यक उपचारात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
बालविकासाची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाची –
बालकांचा विकास केवळ शारीरिक वाढीपुरता मर्यादित नसून त्यांचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि भाषिक विकासही तितकाच महत्त्वाचा असल्याचे नायर यांनी स्पष्ट केले. ECD कार्यक्रम केवळ अंगणवाडी केंद्रापुरता मर्यादित न ठेवता कुटुंब आणि समुदायाच्या सहभागातून प्रभावीपणे राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी गरोदर महिला व स्तनदा मातांशी खाली बसून आपुलकीने संवाद साधला. महिलांच्या आहार, आरोग्य, स्तनपान, बालसंगोपन तसेच बालकांच्या वाढीशी संबंधित अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. बालकांच्या संगोपनात आईसोबत वडील, आजी-आजोबा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा सहभाग वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि भावनिक विकासाची जबाबदारी केवळ आईची नसून संपूर्ण कुटुंबाची आहे, हा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पोषण ट्रॅकर, नर्चर ॲपद्वारे कुपोषित बालकांचे सनियंत्रण –
नायर यांनी पोषण ट्रॅकर ॲपवरील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच Nurture ॲपमध्ये VCDC अंतर्गत नोंद असलेल्या कुपोषित बालकांच्या सनियंत्रणाची स्थिती तपासली. कुपोषित व जोखमीतील बालकांची नियमित माहिती घेऊन त्यांच्या प्रगतीनुसार आवश्यक हस्तक्षेप करावा, तसेच उपलब्ध डिजिटल माहितीचा प्रभावी वापर करून बालकांच्या पोषणस्थितीत सुधारणा घडवून आणावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषद शाळेतही शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा –
क्षेत्रभेटीदरम्यान नायर यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेलाही भेट दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत ‘निपुण’ ॲपच्या माध्यमातून अध्ययन निष्पत्ती तपासली. विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रगतीवर विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
बचत गटांच्या महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन –
नायर यांनी गावातील महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यवसायातील अडचणी, आवश्यक सुविधा आणि गरजा जाणून घेतल्या. उपलब्ध संधींचा प्रभावी उपयोग करून विविध व्यवसाय व उत्पन्नवाढीचे उपक्रम हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक उपलब्ध संसाधनांवर आधारित उद्योग-व्यवसाय विकसित करून महिलांनी आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांशी थेट संवाद साधून समस्या जाणून घेतल्या –
गावातील नागरिकांशीही नायर यांनी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या व स्थानिक गरजा जाणून घेतल्या. बालकांच्या संगोपनात वडिलांचा सक्रिय सहभाग वाढविणे, बालकांना योग्य पोषण व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि बालविकासाच्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बालकांचे पोषण व विकास, कुटुंबाचा सहभाग, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि समुदायाचा सहभाग या सर्व बाबींचा एकत्रित आढावा घेत झालेली वसंतवाडी येथील ही क्षेत्रभेट परिणामाभिमुख प्रशासनाचे उदाहरण ठरली.






