जळगाव, 17 सप्टेंबर : मागील तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला. दरम्यान, मध्यप्रदेशात धरण क्षेत्रात जास्त पाऊस झाल्याने हतनूर धरण क्षेत्रात जास्त पाणीसाठी झाला होता. दरम्यान, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हतनूर धरणाचे सर्व दरवाजे खुले होते. तसेच तापी नदीला पुर आल्याने काही भागात शेतपीकांचे नुकसाने झाले आहे.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन –
तापी नदीला आलेल्या पुरामुळे व बॅकवॉटरने बाधीत शेतपिकांची तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.
नदीकाठच्या भागात नुकसान –
संततधार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी रावेर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. मध्यप्रदेशातील पावसामुळे तापी नदीच्या जलपातळीत झालेल्या वाढीमुळे हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने तसेच तापी नदीचे बॅकवॉटर नदीकाठच्या गावातील शेत पिके व घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तात्काळ पंचनामा करा –
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. या गावातील 67 कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम केले गेले. तलाठी, महसूल सहायक यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करावा. तसेच लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशा सूचनाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आहेत.