मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवीन चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे. आयसीसीचे विद्यमान चेअरमन न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. बार्कले यांनी सलग दोन वेळा हे पद भूषवले. यानंतर तिसऱ्या कार्यकाळासाठी त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता.
2019 पासून जय शहा हे बीसीसीआयचे सचिव आहेत. 35 वर्षीय शहा हे 1 डिसेंबरपासून 62 वर्षीय ग्रेग बार्कले यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारतील. शहा हे आयसीसीच्या वित्त व्यवहार उपसमितीचे अध्यक्षही आहेत. दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल जय शहा यांनी काल मंगळवारी रात्री सांगितले की, आयसीसी चेअरमनपदाची ही प्रतिष्ठित भूमिका स्वीकारण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या ICC सदस्य मंडळांचे मी मनापासून आभार मानतो. जगभरात आमच्या खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. माझ्या कार्यकाळात कसोटी क्रिकेट हा खेळाचा ‘पाया’ बनेल. तसेच ‘क्रिकेटच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्याचा’ प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
किती वर्षांचा असेल कार्यकाळ –
आयसीसी चेअरमनपदाचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. हा सहा वर्षांचा कार्यकाळ प्रत्येकी दोन वर्षांच्या तीन भागात विभागलेला आहे. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले 4 वर्षे या पदावर राहिले. दोन वर्षांच्या तिसऱ्या टर्ममध्ये आपल्याला स्वारस्य नसल्याचे त्यांनी आयसीसीला सांगितले होते. तेव्हापासून जय शहा यांचा दावा सर्वात मजबूत मानला जात होता. अपेक्षेप्रमाणे जय शहा यांच्या विरोधात कोणीही निवडणूक लढवली नाही आणि त्यांची बिनविरोध निवड झाली.
आयसीसीचे नेतृत्त्व करणारे पाचवे भारतीय –
जय शाह हे आयसीसीचे नेतृत्त्व करणारे पाचवे भारतीय आहेत. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, शशांक मनोहर आणि एन श्रीनिवासन यांनी आयसीसीचे नेतृत्त्व केले आहे. जगमोहन दालमिया आणि शरद पवार यांनी आयसीसी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. शशांक मनोहर आणि एन श्रीनिवासन चेअरमनपदी होते.
बीसीसीआयच्या सचिव पदाचा द्यावा लागणार राजीनामा –
35 वर्षीय जय शाह आयसीसीचे चेअरमन बनणारे सर्वात तरुण बनले आहे. जय शहा 2019 पासून बीसीसीआय सचिव पदावर आहेत. आता त्यांना हे पद सोडावे लागणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाची सर्वसाधारण सभा पुढील महिन्यात किंवा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यावेळी ते राजीमाना देतील, अशी शक्यता आहे.
हेही वाचा – महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला कठोर इशारा, म्हणाले..