मुंबई : राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे आयोजित ‘मुंबई टेक वीक 2025’मध्ये ‘गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी’ या विषयावर संवाद साधला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आशियातील सर्वात मोठा इव्हेंट मुंबई टेक विक हा मुंबईत पार पडला. या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या इव्हेंटच्या निमित्ताने चांगल्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत. यामध्ये मेटासोबत आम्ही एक करार केला आहे. ज्यात व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स ही संकल्पना आणलेली आहे. याद्वारे राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील.
मागच्या काळात आपल्या मुंबई मेट्रोचं तिकिट जेव्हा आणलं, आमच्या लक्षात आलं की, 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक व्हॉट्सअॅपवर तिकीट खरेदी करत आहेत आणि म्हणूनच व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स ही संकल्पना आणलेली आहे. याद्वारे यापुढे लोकांना 500 सेवांचा लाभ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्याठिकाणी घेता येतील. अशा नवीन पद्धतीचा हा करार झालेला आहे.
गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सअॅप वापरतो आहे. आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही. हे सर्व तो आता त्याठिकाणी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्राप्त करू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आज एनपीसीआय, ज्यांनी यूपीआय तयार केलं, जगातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजिकल गेटवे, हा जो भारतात तयार झाला, ज्याची 80 देशांनी सेवा घेतली, अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वॉर्टर हे मुंबईत तयार करण्यासाठी आज आम्ही त्यांना जागेची कागदपत्रे सुपूर्त केले आहेत. मुंबईसाठी तंत्रज्ञान हब म्हणून ही सर्वात मोठी घोषणा आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा : Jalgaon DM Ayush Prasad : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने रचला नवा विक्रम, महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक!