मुंबई, 26 जून : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजदर कमी होणार असल्याची माहिती दिली आहे. असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात पुढील पाच वर्षांत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या वर्षभरात राज्यात 10 टक्के तर टप्प्याटप्प्याने पाच वर्षांत 26 टक्क्यांपर्यंत वीजदर कमी होणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री ‘एक्स’पोस्ट करत वीजदर कमी होण्याबाबतची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के इतके वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिला असून आम्ही त्यांचे आभारी आहोत.
साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर केल्या जात असत. परंतु, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली आणि त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. दरम्यान, या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहेत.
राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे 70 टक्के इतके आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होणार आहेत. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात देखील बचत होणार आहे.
त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला आणि एमईआरसीने हा आदेश दिला. दरम्यान, ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’पोस्टमध्ये म्हटलंय.