नवी दिल्ली, 27 मे: राज्यात सध्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते आतापर्यंत जागावाटपाचा तिढा मात्र कायम आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केल्यानंतर महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरून जळगावच्या जागाचा तिढा संपल्याचे समजते.
विधानपरिषदेच्या जागावाटपाबाबत बहुतांश सहमती झाली असून, उर्वरित नाशिक-छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या जागांवरील तिढाही लवकरच सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत माध्यमांसोबत बोलताना दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत बोलताना नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या तीन जागांवर तिढा कायम असल्याचे सांगितल्याने जळगावच्या जागाचा तिढा संपला असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, जागावाटपाबाबत आमच्यात जवळपास एकमत झाले आहे. मात्र, शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांपैकी किमान एक जागा आम्हाला मिळावी, असा आमचा आग्रह आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्याची जागा मागण्यात आली आहे. त्यामुळे या दोन मुद्द्यांवरच चर्चा सुरू असून, तेही लवकरच मार्गी लागतील. दरम्यान, आता काही कठीण राहिलेले नाही. कठीण पेपर संपला असून सोपा पेपर बाकी आहे. टीकमार्क करायचंय अन् टीकामार्क झाल्यावरून विषय संपेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘जागावाटपाचा विषयही मुंबईतच मार्गी लावला जाईल’ –
विधानपरिषदेच्या जागावाटपाचा मुद्दा दिल्ली दरबारी सोडवला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. जागावाटपाबाबत दिल्लीत कोणतीही बैठक झालेली नाही. या संदर्भातील बैठक मुंबईतच होणार असून, जागावाटपाचा विषयही मुंबईतच मार्गी लावला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.






