नवी दिल्ली, 18 मे: लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “परीक्षांचे पेपर वारंवार का फुटत आहेत?” असा थेट सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. तसेच, इतक्या गंभीर घटनांनंतरही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अद्याप पदावरून हटवण्यात आले नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी काय म्हटलंय? –
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तब्बल 22 लाख नीट विद्यार्थ्यांची फसवणूक केली असून संसदेचाही अपमान केला आहे. संसदीय समितीच्या अहवालात विरोधी पक्षाचे खासदार सहभागी असल्यामुळे तो अहवाल फेटाळण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
२०२४ आणि २०२६ मधील नीट पेपरफुटी घटनांचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, २०२४ मध्ये पेपरफुटी झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली नव्हती आणि कोणत्याही मंत्र्याने जबाबदारी स्वीकारली नव्हती. त्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर २०२६ मध्ये पुन्हा पेपरफुटीची घटना घडली. यावेळी परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी शिक्षणमंत्र्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न –
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना तीन थेट प्रश्न विचारले आहेत. वारंवार पेपरफुटी का होत आहे, ‘परीक्षा पे चर्चा’वर सरकार मौन का बाळगत आहे आणि सातत्याने अपयशी ठरणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना पदावरून का हटवले जात नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
राहुल गांधींचा मोठा आरोप –
मोदी सरकार जबाबदारी स्वीकारण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. सरकार आधी शांत राहते, नंतर दोषींना संरक्षण देते आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरच हल्ला चढवते, असा दावा त्यांनी केला. तसेच, २०२४ मधील प्रकरणानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांना पदावरून हटवून त्यांची दुसऱ्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
हेही वाचा: भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन






