रत्नागिरी : औरंगजेब हा क्रूर शासक होता आणि आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे, या शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. ते रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा युती सरकारवर कडाडून हल्ला केला,
नेमकं काय म्हणाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ?
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने त्याच्या वडिलांना जेलमध्ये टाकले आणि औरंगेजब नेहमी धर्माचा आधार घ्यायचा. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. नेहमी धर्माचा आधार घेतात. दुर्दैवाने आज महाराष्ट्रात फडणवीस सारखेच आहेत. त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे, या शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक –
या क्रूरकर्मा औरंगजेबाला मराठी माणसाने या मातीत गाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आम्हाला प्रमाण आहे पण भाजपाला शिवाजी महाराजांचा इतिहास व शौर्य पुसून टाकायचे आहे म्हणून एक प्रवृत्ती औरंगजेबाची कबर उखडून टाका असे सांगत आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे, ते शौर्य पुसून टाकायचे षडयंत्र आहे. औरंगजेबाचे उदात्तिकरण कोणीच करू नये पण भाजपा स्पॉन्सरच त्याचे उदातिकरण करत आहेत, असेही सपकाळ म्हणाले.
राज्यात कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. बीड जिल्ह्यात सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्यामागे कोण आका होता ते जनतेने पाहिले, आता आकानंतर खोक्या आला आहे. एक मंत्री खोटी कागदपत्रे दिल्याप्रकरणी दोषी ठरला आहे तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री रोज बेताल वक्तव्य करून राज्यातील शांतता व सौहार्दाला छेद देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस रमेश कीर उपस्थित होते.
हेही वाचा – घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?