मुंबई, 7 मार्च: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून काल 6 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पायाभूत सुविधा, उद्योग, शेती आणि सामाजिक योजनांवर विशेष भर देणाऱ्या त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
विकसित महाराष्ट्राच्या 2047 च्या दृष्टीकोनाला लक्षात ठेवत राज्यातील विकास प्रकल्पांना गती देणे, शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि रोजगार निर्मिती वाढवणे यावर सरकारने या अर्थसंकल्पातून विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अर्थसंकल्पातील काही प्रमुख 10 घोषणा पुढीलप्रमाणे आहेत.
अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा –
- शेतकरी कर्जमाफीची योजना – ₹2 लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी; नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ₹50 हजार प्रोत्साहन.
- अजित पवार स्मारक – माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक आणि त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करण्याची घोषणा. राज्याचा हा अर्थसंकल्प स्व. अजित दादा पवार यांना समर्पित.
- ग्राम सडक योजना – टप्पा 3 – ग्रामीण रस्ते व पुलांच्या कामांना गती; मुंबई–पुणे जलदगती ट्रेन प्रकल्पासाठी तरतूद. ग्रामसडक योजनेअंतर्गत 30 हजार जोडली गावे.
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार आहे. या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती. राज्यात आतापर्यंत 37 लाख ‘लखपती दीदी’ तयार झाल्या असून, आगामी काळात आणखी 25 लाख महिलांना या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट.
- कृषी क्षेत्राला बळ – गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा समावेश, एआय आधारित कृषी संशोधन, अॅग्रीस्टॅक व फार्मर आयडी उपक्रम. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची होणार सुरुवात.
- उद्योग व रोजगार – नवीन गुंतवणूक धोरण, प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म-लघु उद्योग केंद्र; 50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट.
- क्रिएटिव्ह व गेमिंग हब – मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी; राज्यात 295 पेक्षा अधिक गेमिंग स्टुडिओ उभारण्याची योजना.
- 2047 विकास दृष्टीकोन – महात्मा फुले 200 वी जयंतीनिमित्त समिती व कार्यक्रम; संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट आणि रायगड येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त सुविधा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण. ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार.
- पर्यटन विकास – साताऱ्यातील वासोटा किल्ल्यावर रोपवे प्रकल्प; रामटेक (नागपूर) येथे तिसरी चित्रसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव.
- पायाभूत सुविधांना गती – मुंबईत भुयारी मेट्रो, राज्यात 1200 किमी मेट्रो नेटवर्क आणि 6000 किमी द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे लक्ष्य.






