पाचोरा, 7 सप्टेंबर: तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील असलम फत्रू तडवी यांच्या घराकडे जाण्या-येण्याचा मार्ग अतिक्रमणामुळे अडविण्यात आल्याचा आरोप करत, अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी तडवी यांनी सोमवारी (दि. ७) उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाचोरा येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. तडवी यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुका आणि एकलव्य आदिवासी वंचित आघाडी, जळगाव जिल्हा (पश्चिम) यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के. बी. अंजने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामपंचायतीला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे पत्र दिले. मात्र, ठोस कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका तडवी यांनी घेतली आहे.
असलम तडवी हे वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीचे जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पिंपळगाव हरेश्वर येथे त्यांच्या घराकडे जाण्या-येण्याच्या मार्गावर काही व्यक्तींनी बांधकाम करून अडथळा निर्माण केला आहे. याबाबत त्यांनी मागील दोन वर्षांपासून विविध प्रशासकीय स्तरांवर तक्रारी करूनही अद्याप अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
‘दोन वर्षांपासून पाठपुरावा, तरीही कारवाई नाही’ –
“माझ्या घराकडे येण्या-जाण्याचा रस्ता अडविण्यात आला आहे. ग्रामपंचायतीकडून वारंवार कारवाईचे आश्वासन मिळाले; मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही. २०२४ पासून पंचायत समिती स्तरापासून आयोगापर्यंत तक्रारी केल्या आहेत. घराकडे जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून द्यावा, हीच माझी मागणी आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार,” अशी भूमिका असलम तडवी यांनी मांडली. बीडीओंनी भेट देऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले असले, तरी केवळ आश्वासनावर आपण समाधानी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतीला तातडीने कार्यवाहीचे निर्देश –
उपोषणाची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के. बी. अंजने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तडवी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामपंचायत पिंपळगाव हरे येथील अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडील अभिलेखांची खात्री करून संबंधित जागेवर ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण निष्पन्न झाल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ५३ नुसार नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कार्यवाही करून आवश्यक पुराव्यांसह अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
अंजने यांनी उपोषणकर्त्याला प्रशासनास सहकार्य करून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, प्रत्यक्ष अतिक्रमण हटवून रस्ता खुला होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका तडवी यांनी घेतली.
“माझ्या घराकडे जाण्या-येण्याचा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला असून, २०२४ पासून विविध स्तरांवर तक्रारी करूनही कार्यवाही झालेली नाही. अतिक्रमण हटवून मला रस्ता मोकळा करून द्यावा, हीच माझी मागणी आहे. ठोस न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही; बीडीओंच्या आश्वासनाने मी समाधानी नाही.”
- असलम फत्रू तडवी (उपोषणकर्ता, पिंपळगाव हरे. ता. पाचोरा)
“घराला रस्ता मिळावा यासाठी असलम तडवी यांनी ग्रामपंचायतीपासून एससी-एसटी आयोगापर्यंत पाठपुरावा केला आहे. प्रशासनाकडून वंचित घटकाच्या या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तडवी यांना न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरूच राहील.”
- अनिल लोंढे (जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)
“असलम तडवी यांच्या घराकडे जाण्या-येण्याच्या मार्गावर अतिक्रमण झाल्याची तक्रार करूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाने आंदोलनाची तातडीने दखल घेऊन अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा. अन्यथा, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
संदीप जाधव (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)
“ग्रामपंचायतीला अभिलेख तपासून अतिक्रमण निष्पन्न झाल्यास नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जागेची मोजणी करून अतिक्रमण निष्कासित करत संबंधितांना जाण्या-येण्याचा रस्ता मोकळा करून देण्याची कार्यवाही केली जाईल. उद्या गावपातळीवरील कार्यवाहीवेळी विस्तार अधिकारी नारायण परदेशी यांना तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात येणार आहे.”
-
के.बी.अंजने ( पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी)
एकीकडे पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतीला अतिक्रमणाची खात्री करून नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, तर दुसरीकडे मागील दोन वर्षांपासून आश्वासनांनंतरही प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याचा तडवी यांचा दावा आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे पिंपळगाव हरेश्वरसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?






