हरारे, 7 फेब्रुवारी : झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला. मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या विजयासह सहाव्यांदा अंडर-१९ वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावून इतिहास रचला.
अंतिम सामन्यातील आकडेवारी –
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मागील सामन्यात शतक झळकावणारा आरोन जॉर्ज अवघ्या ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भक्कम भागीदारी रचली. आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ५३ धावांची संयमी खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांच्या मदतीने तुफानी १७५ धावा ठोकल्या.
वैभवचे दुहेरी शतक केवळ २५ धावांनी हुकले. त्यानंतर वेदांत त्रिवेदीने ३२, विहान मल्होत्राने ३०, अभिज्ञान कुंडूने ४० आणि कनिष्क चौहानने नाबाद ३७ धावा करत भारताची धावसंख्या ९ बाद ४११ वर नेली.
सहाव्यांदा अंडर-१९ वर्ल्डकपवर आपले नाव कोरले –
भारतीय संघाने दिलेल्या ४१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीलाच धक्का बसला. सलामीवीर जोसेफ मुरेस १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर बेन डॉकिन्स (६६) आणि बेन मेयस (४५) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठी खेळी उभी राहू शकली नाही. शेवटी कॅलेब मॅथ्यू फाल्कनरने झुंज दिली, पण विकेट्स पडत गेल्याने इंग्लंडला पराभव टाळता आला नाही.
भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ १०० धावांनी पराभूत झाला आणि भारताने सहाव्यांदा अंडर-१९ वर्ल्डकपवर आपले नाव कोरले.
वैभव सूर्यवंशीची दमदार कामिगिरी –
भारत विरूद्ध इंग्लंडच्या या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने दमदार फलंदाजी केली. वैभवने केवळ ५५ चेंडूत शतक झळकावत स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान शतक नोंदवले. संपूर्ण स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने १५ चौकार आणि १५ षटकारांची आतषबाजी करत प्रेक्षकांना थक्क केले.






