जळगाव, 19 जून : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील 13 वर्षीय तेजस महाजन याच्या खूनप्रकरणाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तिन्ही आरोपी दारूच्या नशेत असताना तेजसचा त्यांना धक्का लागला. मात्र केवळ धक्का लागला म्हणून तिन्ही आरोपींना तेजसला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर चाकूने गळा चिरून त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.
नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील 13 वर्षीय तेजस महाजन हा त्यांच्या दुकानावर असताना सायंकाळपर्यंत घरी परतला नाही. यानंतर सायंकाळी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. याप्रकरणी एरंडोल पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी खर्ची गावालतच्या शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला. तेजसची हत्या ही नरबळी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, आता याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेने सदर गुन्हा उघडकीस आणलाय.
‘धक्का लागल्याने हत्या’ –
तेजस खून हत्याप्रकरणात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हरदास डेमशा वास्कले (वय 35 रा. नांदीया, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) आणि सुरेश नकल्या खरते (वय 34 रा. धोपा, ता. झिरण्या, जि. खरगोन) अशी त्यांची नावे आहेत. तसेच एक आरोपी अद्याप फरार असून रिचडिया तुकाराम कटोले (वय 20 रा. नांदीया, ता. भगवानपूरा) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, तिन्ही आरोपी दारूच्या नशेत असताना तेजसचा त्यांना धक्का लागला. मात्र, केवळ धक्का लागला म्हणून तिन्ही आरोपींना तेजसला मारहाण करत त्याची चाकूने गळा चिरून हत्या केलीय.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक काय म्हणाले? –
जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, तीनही आरोपी हे रिंगणगाव परिसरात मध्य प्रदेशातून कामानिमित्त आले होते. खून प्रकरणानंतर ते गावात नसल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असता त्याने सदर हत्येप्रकरणी कबुली देत दोन आरोपींची नावे सांगितली. त्या दोन आरोपींपैकी एकास अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे.
View this post on Instagram
रिंगणगाव हत्या प्रकरणातील तीनही आरोपी 16 जून रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत होते. असे असताना तेजसचा आरोपींना धक्का लागल्याने त्यांच्यात वाद झाला. यानंतर तीनही आरोपींनी त्या मुलास मारहाण केली. तसेच एकाने गळा चिरून हत्या केली. आरोपींनी सदर मृतदेह गावाच्या शेजारी फेकला आणि घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, तेजस हत्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलीय.
नरबळीचा संशय –
तेजसच्या हत्येप्रकरणी त्याचे वडील गजानन महाजन यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवदेन दिलंय. माझ्या मुलाची हत्या नरबळीच असल्याचे सांगत न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी एसपींकडे केलीय. तर दुसरीकडे ही हत्या नरबळीतून झालेली नसल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर आल्याचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितलंय.