जळगाव, 1 जुलै: प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा-१ व टप्पा-२) अंतर्गत अपूर्ण राहिलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, घरकुलासाठी मंजूर झालेल्या जागांवर अतिक्रमण झालेल्या प्रकरणांमध्ये जुलै महिन्यात विशेष अतिक्रमण निर्मूलन अभियान राबविण्यात येणार आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने ही अतिक्रमणे हटवून लाभार्थ्यांना घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिली.
काय आहे संपुर्ण बातमी? –
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध कारणांमुळे अनेक घरकुले अद्याप अपूर्ण असून, लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा निवारा लवकरात लवकर मिळावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत त्या स्वतः लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन अपूर्ण घरकुलांमागील कारणांचा प्रत्यक्ष आढावा घेत आहेत.
या पाहणीत अनेक ठिकाणी घरकुलासाठी मंजूर करण्यात आलेल्या जागांवर अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे. अशा प्रकरणांमध्ये स्थानिक पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने अतिक्रमण हटवून संबंधित जागा लाभार्थ्यांच्या ताब्यात देण्यासाठी जुलै महिन्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी मंजूर झालेल्या जागांवर अतिक्रमण झाले असेल, त्यांनी आपल्या ग्रामसेवक तसेच संबंधित गटविकास अधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधावा. प्रशासनाशी समन्वय साधून अतिक्रमण हटवून घेण्याची संधी या अभियानातून उपलब्ध होणार असून, त्यानंतर घरकुलांचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले आहे.
या विशेष मोहिमेमुळे अतिक्रमणामुळे रखडलेली घरकुले मार्गी लागण्यास मदत होणार असून, पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर लवकर मिळण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 15 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; शासनाने घेतला मोठा निर्णय






