मुंबई, 27 मे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळल्याने (Onion Price Crash) शेतकरी आक्रमक झाले असून, हा प्रश्न आता थेट देशाच्या राजधानीत पोहोचला आहे. कांदा प्रश्नावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत कांदा, पाणी आणि एसटीच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बातमीतील ठळक मुद्दे:
- राजकीय वातावरण तापले: नाशिकच्या चांदवडमध्ये कालच विरोधकांचे मोठे रस्ता रोको आंदोलन.
- केंद्राचा हमीभाव: नाफेडमार्फत १,५८० रुपये प्रति क्विंटलने रब्बी कांदा खरेदी सुरू.
- शेतकऱ्यांची मागणी: उत्पादन खर्च निघण्यासाठी किमान ३,००० रुपयांच्या दराची मागणी.
- दिल्लीत महत्त्वाची बैठक: मुख्यमंत्री फडणवीस आणि शिष्टमंडळ आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार.
नाशिकमध्ये विरोधकांचे तीव्र आंदोलन –
नाशिकच्या चांदवडमध्ये काल 26 मे रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुंबई-आग्रा महामार्ग रोखत विराट ‘क्रांती महामोर्चा’ काढला होता. कांद्याला प्रति क्विंटल ३,००0 रुपये भाव मिळावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
दरम्यान, वाढत्या विरोधामुळे केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील रब्बी कांदा खरेदीसाठी १,५८० रुपये प्रति क्विंटल (१५.८० रुपये किलो) असा किमान हमी खरेदी दर (MAPP) जाहीर केला असून काल, २६ मे पासून नाफेड आणि एनसीसीएफ (NCCF) मार्फत ही खरेदी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे उत्पादन खर्च निघण्यासाठी किमान अडीच ते तीन हजार रुपयांचा दर मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आहे.
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत –
सध्यास्थितीत बाजारात कांद्याला सरासरी फक्त १,१०० ते १,२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एकरी उत्पादन आणि लागवडीचा खर्च पाहता, कांदा उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी भावात विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकर अडचणीत असून कांद्याला कायमस्वरूपी स्थिर निर्यात धोरण असावे, जेणेकरून शेतकऱ्यांना वर्षभर योग्य भाव मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






