अंतरावली सराटी (जालना), 16 मे: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. येत्या 30 मे पासून जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे जरांगे-पाटील उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार –
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 30 मे पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत सरकारकडून वारंवार मराठा समाजाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी सरकारला मोठा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे यांचा सरकारविरोधात आरोप –
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाज गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करत आहे. मात्र, या लढ्यामुळे समाजाच्या हाती नेमकं काय लागलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून 58 लाख नोंदी समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारला मराठा समाजाची प्रगती मान्य नसून, समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.
माझ्या विरोधात बोलण्यासाठी 2 कोटी रूपये दिले –
सत्ता कोणाचीही असो, मराठा समाजाशिवाय राज्यकारभार चालू शकत नाही, असेही ते म्हणाले. तसेच, भाजपमधील मराठा समाजाच्या मुलींनाही आरक्षणाचा लाभ मिळणार नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी काही गंभीर आरोपही केले. आपल्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी एका मंत्र्याने एका संघटनेला प्रत्येकी दोन कोटी रुपये दिल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. तब्बल 16 संघटनांना पैसे देण्यात आल्याचे सांगत, त्यातील एका प्रामाणिक व्यक्तीने ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्याचे त्यांनी म्हटले.
जरांगेंचा सरकाला मोठा इशारा –
काही संघटनांच्या पत्रकार परिषदाही ठरल्या होत्या, मात्र त्यानंतर काय घडले याची माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजाने अफवा आणि खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत त्यांनी आंदोलनाच्या मुदतीपूर्वी सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. अन्यथा, राज्यात भयानक आंदोलन होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या –
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करत सरकारसमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत:
- मराठवाड्यातील मराठा समाजाला तातडीने कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करावे.
- ज्या 58 लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र द्यावे.
- सातारा गॅझेट संदर्भातील शासकीय निर्णय त्वरित लागू करावा.
- उपसमिती कोणतेही ठोस काम करत नसून समाजात मतभेद निर्माण करत असल्याचा आरोप करत ती बरखास्त करावी.
- शिंदे समितीला काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी.
- मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे.
- मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
- कुणबी आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे.






