नांदेड, 6 फेब्रुवारी : आम्ही उठाव केल्यानंतर आता शिंदे साहेब फुटले आहेत. त्यामुळे ते लोकं निवडून येत नाहीत, असा शिवसेनेचा इतिहास आहे, असे अनेकजण सांगायचे. मात्र, आम्ही शिवसेनेतून फुटलो नाही तर संजय राऊत शिवसेनेतून फुटले. त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली असा जोरदार हल्लाबोल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर केला. नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने आयोजित केलेल्या आभार कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, त्यांनी शिवसेना फोडली…बाळासाहेबांची स्वप्न भंग केलीत. आम्ही आयुष्याभर शिवसेनेसाठी दिलीत. 35-35 वर्ष हर-हर महादेवच्या घोषणा देत शिवसेना वाढवली. अनेक गुन्हे अंगावर घेतले. खरंतर, शिवसेना कोणी वाचवली असेल तर ती शिंदे साहेबांनी वाचवली. शिवसेनाप्रमुखांनी आदेश द्यावा आणि मुंडी द्यावी, असे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि यामुळेच शिवसेना वाढली. दरम्यान, संजय राऊतांवर एकतरी गुन्हा दाखल आहे का सवाल मंत्री पाटील यांनी केलाय.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, सरकार आल्यानंतर सरकारचा कोणता प्रतिनिधी एखाद्या मतदारसंघात-जिल्ह्यात नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात मतदारांचे आभार मानायला जातात ते एकमेव व्यक्ती म्हणजे एकनाथराव संभाजी शिंदे होय. दरम्यान, शिवसेना प्रमुखांचे विचार वाचविण्याचे काम हे एकनाथ शिंदे यांनी केले असल्याचेही ते म्हणाले.
महायुतीच्या काळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजनांमुळे मतदारांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले आणि निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले, असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, आता ज्यांनी तुमच्याकरिता काम केलंय त्यांना आता पंचायत समिती-जिल्हा परिषदेत निवडून आणण्याची जबाबदारी आहे, असे व्यासपीठावर उपस्थित आजी माजी आमदार-खासदार यांना उद्देशून म्हणताना गुलाबराव पाटील म्हणाले.
शिवसेनाचा नांदेडमध्ये आभार दौरा –
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्यावतीने आभार दौरा केला जातोय. आज नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा आभार दौरा पडतोय.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत