जळगाव, 25 जून: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जळगावच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गट आग्रही आहे. तर दुसरीकडे भाजप नेते तथा महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या जागावाटपाबाबत वक्तव्य केलंय आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून जळगाव विधान परिषदेत आमचाच आमदार असून ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे, असा आमचा आग्रह असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
जामनेरमध्ये भाजपची पार पडली बैठक?–
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा आपल्या वाटेला येण्यासाठी शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीव काल रविवारी 24 मे रोजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख आमदार आणि खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल दोन तास बंद दाराआड चाललेल्या या गुप्त बैठकीत भाजपने आपली रणनीती आखल्याच्या चर्चा केल्या जात आहेत.
एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय –
जामनेरात पार पडलेल्या या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, जळगावची जागा भाजपकडेच राहावी यासाठी आम्ही पूर्णपणे आग्रही आहोत. आमच्याकडे या जागेसाठी 10 पेक्षा जास्त सक्षम इच्छुक उमेदवार आहेत. राज्यातील सर्व 17 जागांचा तिढा मेरिटच्या आधारावर सुटेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून यावर एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतील.
गुलाबराव पाटलांच्या दाव्यावर मिश्किल टोला –
शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्या उमेदवारीसाठी तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. यावर टोला लगावताना महाजन मिश्किलपणे म्हणाले की, “गुलाबराव पाटील मुंबईला गेले आहेत, तर मी देखील साडेचारच्या विमानाने दिल्लीला रवाना होत आहे. पण मी तिकिटासाठी जात नाहीये. दरम्यान, प्रताप पाटील यांच्या उमेदवारीबाबत अद्याप महायुतीत कोणतीही थेट चर्चा झालेली नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.






