चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 28 जून : आमच्या समोरचं लक्ष्य आता जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणूका आहेत. यामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यात 100 टक्के भगवा फडकावयचाय, असा निर्धार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. पाचोरा शहरातील प्रसाद हॉलमध्ये आज 28 जून रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, मी स्वतःचं नव्हे तर माझ्यासोबत माझ्या संपुर्ण परिवाराने जेवढी मेहनत विधानसभेला घेतली नसेल त्याहून 10 पट अधिक मेहनत जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही निश्चितपणे घेऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांमागे खंबीरपणे उभे राहणार, असा विश्वासही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिला. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, माजी जि. प. सदस्य पदम पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवशक्ती-भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राम्हणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, तालुकाप्रमुख विनोद तावडे, यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच पाचोरा शहरातील व तालुक्यातील सर्व शिवसेना- युवासेना व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव, व्हॉ.चेअरमन, संचालक मंडळ शेतकी संघ पाचोरा आजी-माजी नगराध्यक्ष. उपनगराध्यक्ष व नगरसेवक, न.पा पाचोरा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, वि.का सोसायटीचे चेअरमन, व्हॉइसचेअरमन व संचालक मंडळ तसेच शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, बुथप्रमुख, शिवदुत व शिवसैनिक आदी उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मला ऐतिहासिक यश मिळालं आणि मतदारसंघात इतिहास घडला. खरंतर, मतदारसंघाचे माझ्यावर इतके उपकार झाले की ते मी कधीही विसरू शकणार नाही. जळगाव जिल्ह्यातील एकमेव असा पाचोरा-भडगाव मतदारसंघाने दहशतीला दूर सारत शांततेला तसेच विकासाला साथ दिली. मतदारसंघाचा विकास आतापर्यंत कोणीही केला नसेल एवढा विकास मागील काही वर्षांत झाला. दरम्यान, शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेऊन घराघरापर्यंत विकासकामांची माहिती पोहचवली आणि जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याने मतदारसंघात ऐतिहासिक विजय झाला, अशा भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केल्या.
‘लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा’ –
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 80 जागा लढवल्या. महाराष्ट्राने एकनाथ शिंदेंना स्विकारलं आणि तब्बल 60 जागांवर विजय मिळाला. खरंतर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने लाडक्या बहिणी, तरूण तसेच शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आणि शिवसेनेसह महायुतीला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिली. यासोबतच लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा या विधानसभा निवडणुकीच्या निकालात आहे. दरम्यान, जे स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांसाचे वारसदार समजत होते. त्या उबाठाने 120 जागा लढवल्या आणि 20 जागांवर ते थांबले, असा टोलाही आमदार पाटील यांना लगावला.
‘केंद्रासह राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला’ –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने देशातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी वर्षाला 6 हजार रूपये देण्याची घोषणा केली. यानंतर राज्यातील महायुती सरकारने देखील एक पाऊल पुढे येत शेतकऱ्यांना 6 हजार रूपये घोषणा देण्याची केली. आता महाराष्ट्रात तब्बल 12 हजार रूपये वर्षांला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
‘विधानसभा निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक’ –
महायुती सरकारने राज्यातील जनेतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात ऐतिहासिक परिणाम पाहायला मिळाला. स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंतच्या इतिहासात अशी पहिली वेळ असेल की विधानसभेत विरोधी पक्षाचा विरोधी पक्षनेते नाहीये. विरोधी पक्षनेता निवडून आणण्याइतपत देखील विरोधक यश मिळवू शकले नाहीत. म्हणून आता महाराष्ट्राचे वातारवण खराब करण्याचे काम आता मुंबईत केले जात असल्याची टीका आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली.
‘विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न’ –
आम्हाला देशावर प्रेम आहे आणि आपल्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे. यामुळे मराठीवर आमचं प्रेम आणि अधिकार आहेच. मात्र, आपली राष्ट्रभाषा असलेली हिंदी भाषा ही आपल्याला अत्यावश्यक आहे. परंतु, राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरे तसेच विरोधक हे मराठीच्या मुद्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही आमदार पाटील यांनी केली.
‘पक्षात मतभेद राहू नयेत’ –
विधानसभा निवडणुकीपासूनच पक्षात मोठ्या प्रमाणात नवीन सदस्य आले आहेत. गर्दी आहे. मात्र, गर्दीत तर मजा येते आणि म्हणून गर्दी सांभाळायला देखील ताकद आणि क्षमता लागते. नाहीतर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या ठेऊन हे शक्य होत नाही, असा टोलाही किशोर आप्पा पाटील यांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, तळागळातील कार्यकर्त्यांमध्ये कुठेही मतभेद राहणार नाहीत, याची विशेष काळजी मी गेल्या 25 वर्षांपासून करतोय. आपल्या पक्षात आलेल्या एकाचाही अनादर होणार नाही, याची काळजी कार्यालयातील प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे आमदार पाटील म्हणाले.
‘पाचोरा-भडगाव मतदारसंघात भगवा फडकावयाचाय!’ –
विधानसभा निवडणुकीत मला 40 हजारापर्यंत लीड मिळाला. मात्र, आता हा लीड 50 हजारापर्यंत कसा जाईल हे जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीतून तुम्हाला दाखवयचंय, असेही आमदार पाटील कार्यकर्त्यांना म्हणाले. तसेच नव्याने पक्षात आलेल्यांसोबत एकजूटीने राहून पक्षाच्या बळकटीसाठी तसेच एकनाथ शिंदेच्या नावलौकिकासाठी काम करायचंय. सर्वांनी एकत्रित येऊन पाचोरा-भडगाव मतदारसंघात 100 टक्के जागा जिंकून भगवा फडकावयाचाय,
‘घराघरापर्यंत विकासकामांची माहिती पोहचवा’ –
जनतेला कधीही गृहित धरायचे नाही. आपण आपलं काम करत राहायचं. खरंतर, जोपर्यंत जनतेचा विश्वास संपादन करत नाहीत; तोपर्यंत विजयापर्यंत पोहचू शकणार नाहीत. पाच वर्ष विरोधात राहणं हे सोप्प नाहीये. यामुळे एक-एक मतांचे महत्व ओळखून जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या सदस्यांनी केलेल्या कामाचा डेटा तयार करून प्रत्येक घराघरापर्यंत विकासकामांची माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केले.
महिला आघाडी तसेच युवासेना कार्यकारिणी बरखास्त –
महिला आघाडी तसेच युवासेना पदाधिकाऱ्यांची सध्याची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून आठ दिवसांच्या आत पुन्हा एकदा महिला आघाडी तसेच युवासेनेच्या जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख पर्यंत नवी कार्यकारणी जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा आमदार पाटील यांनी यावेळी केली. तत्पुर्वी, सध्याचे शिवेसेनेचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची नियुक्ती कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले. तसेच लवकरच शेतकरी सेनेचे देखील कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.
सदस्य नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन लवकरात लवकर सदस्यसंख्या वाढविण्यासाठी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले. यासोबच या मेळाव्यात शिवसेनेचे शालिग्राम मालकर, प्रदीप पाटील, स्मिता भिवसेने, ललिता पाटील, अय्युब बागवान आणि नरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रविण ब्राम्हणे यांनी केले. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला.