जळगाव, 18 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत त्रिवेणी संगम प्रभाग संघ व शुरनारी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, पिंप्री खुर्द यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ आज शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी पिंप्री खुर्द, ता. धरणगाव येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, उमेद अभियानातील पदाधिकारी, महिला बचतगटांच्या सदस्यांसह सुमारे २ हजार महिलांनी सहभाग नोंदविला.
आरोग्यापासून रोजगारापर्यंत विविध सेवा एकाच छताखाली –
ग्रामीण भागातील महिलांना विविध शासकीय योजना व सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, तसेच महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सुमारे १ हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबिनसह आवश्यक आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. तसेच ० ते १ वर्ष वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीची सुविधा इंडियन पोस्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली.

महिलांना स्वयंरोजगार व उद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागामार्फत विविध कृषी योजनांची तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना (PMFME) याबाबतही माहिती देण्यात आली.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला व संघांचा गौरव –
उमेद अभियानाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसंघ, प्रभाग संघ तसेच ग्रामसखींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांना संघटित करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाची यावेळी दखल घेण्यात आली.
महिला बचतगटांना आर्थिक बळ –
कार्यक्रमादरम्यान महिला स्वयंसहायता समूहांना २ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. तसेच समूहांच्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी १ कोटी रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी (CIF) वितरित करण्यात आला.
महिलांच्या बचतगटांना केवळ बचत व कर्जपुरते मर्यादित न ठेवता त्यांना उद्योग, रोजगार, कृषीपूरक व्यवसाय आणि आर्थिक उपक्रमांशी जोडून स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या सेवा आणि योजनांचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. महिला सक्षमीकरणातून कुटुंबाचे आणि पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे अधिक चालना मिळाली. कार्यक्रमास बचतगटांच्या सदस्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा: जळगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न






