जळगाव, 10 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात उद्या 11 फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. यामध्ये जळगाव जिल्हाभरातून 81 केंद्रातून 47 हजार 667 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. दरम्यान, बारावीच्या परीक्षेतील गैर प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच कॉपीमुक्त अभियानासाठी जळगाव जिल्ह्यात सात भरारी पथके नियुक्त केली आहेत. यासोबतच प्रत्येक तालुकास्तरावरील अनेक केंद्रांवर बैठे पथक नियुक्त केले आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरूवात –
जळगाव जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 47 हजार 667 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून प्रशासनाच्यावतीने दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षात गैरप्रकार आढळून आले आहेत, अशा 40 केंद्रांवर केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदली करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन अलर्ट मोडवर काम करतंय. परीक्षा काळात 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत, या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदाराला सहआरोपी करण्याचे निर्देश दिले आहेत. गोंधळ होणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर असेल ड्रोन कॅमेऱ्याची नजर –
जळगाव जिल्हा प्रशासनामार्फत संवेदनशील परीक्षा केंद्रांच्या परिसरात ड्रोन कॅमेराव्दारे निगराणी करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची 7 भरारी पथके व बैठे पथक नियुक्त केली आहेत. यासोबतच परीक्षा केंद्रांवर नियुक्त केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळपत्र देण्यात येईल. प्रत्यक्ष गैरप्रकार करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन –
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा महत्वाचा आधारस्तंभ आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थी निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जातील, यासाठी जिल्हा प्रशासन त्यांच्या सोबत आहे. भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करावे, असे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांना सकारात्मक मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील –
याशिवाय, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त आणि कॉपीमुक्त राहतील, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. राज्यात कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे शिक्षणाला पुढे नेऊया, असे आवाहन करत पालकमंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त आणि कॉपीमुक्त राहतील, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत